यंदाच्या पावसाळ्यातही कोकण रेल्वेचा वेग मंदावणार असून त्याविषयीचं परिपत्रक नुकतंच कोकण रेल्वेकडून जाहीर करण्यात आलं आहं. त्याशिवाय पावसाळ्यात कोकणात जाणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. हा बदल हा १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कालावधीत अनेक चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात जातात. त्यामुळे कोकण रेल्वेद्वारे जाहीर केलेलं हे वेळापत्रक गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे.
कोकण रेल्वेच्या विविध भागांत जाणाऱ्या गाडय़ांचा सामान्य वेग हा ताशी ११० किमी इतका असतो. मात्र पावसाळा सुरू झाल्यावर हाच वेग ताशी ४० किमीनं कमी करण्यात येतो. त्यामुळे रेल्वेचा वेग ताशी ७० ते ७५ इतका असेल.
गाडी नंबर | नाव | सुटण्याचं ठिकाण | वेळ |
१०१०४ | मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस | मडगाव | सकाळी ९.१५ ऐवजी सकाळी ८.३० वाजता |
११००४ | सावंतवाडी-दादर राज्यराणी एक्स्प्रेस | सावंतवाडी | सकाळी ९.१५ ऐवजी सकाळी ८.३० वाजता |
१२०५२ | मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस | मडगाव | दुपारी २.३० ऐवजी दुपारी १२ वाजता |
१२६२० | मंगळुरू-एलटीटी मत्स्यगंधा एक्स्प्रेस | मंगळुरू | दुपारी २.३५ ऐवजी दुपारी १२.५० वाजता |
२२९०७ | मडगाव-हापा एक्स्प्रेस | मडगाव | सकाळी १०.४० ऐवजी सकाळी ७ वाजता |
१२७४१ | वास्को-पाटणा एक्स्प्रेस | वास्को द गामा | सायंकाळी ७.०५ ऐवजी सायंकाळी ६ वाजता |
१०२१५ | मडगाव-एर्नाकुलम एक्स्प्रेस | मडगाव | रात्री ९.३० ऐवजी रात्री ९ वाजता |
११०८६ | मडगाव-एलटीटी डबलडेकर एक्स्प्रेस | मडगाव | सकाळी ६ ऐवजी सकाळी ५.३० वाजता |
५०१०१ | मडगाव-रत्नागिरी पॅसेंजर | मडगाव | सायंकाळी ७.१० ऐवजी रात्री ८ वाजता |
कोकण भागात मोठ्या प्रमाणावर पावसाचा जोर असतो. त्यामुळे या भागात दरड कोसळण्याचं प्रमाण देखील अधिक असतं. या दरडी बाजूला काढण्यासाठी खूप वेळ लागत असल्यानं त्या कालावधीत प्रवाशांचे अतोनात हाल होतात. त्यामुळे कोकण रेल्वेवरील काही गाड्यांचा वेग मंदावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- निलेश नाईक, रेल्वे अधिकारी
पावसाळ्याच्या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर काही ठिकाणी दरड तसेच माती कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे रेल्वे सेवा काही कालावधीसाठी ठप्प होतं. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने पावसाळा सुरू होण्याआधीच धोकादायक दरडी कापल्या आहेत.
मात्र, तरीही सुरक्षिततेचा उपाय म्हणून सर्वच धोकादायक ठिकाणी रेल्वे गँगमॅन तसेच इतर कर्मचारी २४ तास कार्यरत असणार आहेत. त्यामुळे दरड कोसळण्यासारखी कोणतीही घटना घडल्यास रेल्वे प्रशासनाला तात्काळ माहिती समजू शकणार आहे. तसंच त्यावर तात्काळ उपाययोजनाही करता येणार आहेत.
हेही वाचा-
रेल्वेप्रवासात मर्यादेपेक्षा जास्त सामान न्याल तर...