Advertisement

प्रवाशांची गर्दी ठरतेय जीवघेणी

मध्य रेल्वेवरील प्रवाशांची वाढती गर्दी जीवघेणी ठरत आहे.

प्रवाशांची गर्दी ठरतेय जीवघेणी
SHARES

मध्य रेल्वेवरील प्रवाशांची वाढती गर्दी जीवघेणी ठरत आहे. दिवसेंदिवस या गर्दीमुळं रेल्वे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. लोकलसेवा कमी त्यात प्रवाशांची संख्या जास्त अशा समीकरणामुळं प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. या अशा गर्दीच्या प्रवासामुळं दरदिवसाला मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला, डोंबिवली यासारखी बहुतेक स्थानक अपघातस्थळं ठरत आहेत. त्यामुळं या मार्गावरून प्रवास करणं योग्य की अयोग्य असा प्रश्न प्रवाशांना सतावत आहे. त्याशिवाय, मध्य रेल्वेच्या उपययोजना, सोयीसुविधा ही प्रवाशांच्या गर्दीच्या तुलनेत कमी पडत आहे. त्यामुळं येत्या काळात प्रवाशांच्या संख्येत वाढ होत गेल्यास अपघातांच्या संख्येत होणारी वाढही नाकारता येणार नाही.

मुंबईसह उपनगरातील रेल्वे प्रवाशांना दरदिवशी प्रवासादरम्यान लेटमार्क, गर्दी या अडचणींचा सामना करावा लागतो. मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात, रेल्वे मार्गावर नेहमी होणाऱ्या तांत्रिक अडचणींवर उपाय करावे, सोयीसुविधा वाढवाव्यात यांसारख्या अनेक मागण्या प्रवासी मध्य रेल्वे प्रशासनाकडं करत आहेत. मात्र, मध्य रेल्वेच्या लोकलचं वेळापत्रक पाहता या मागण्या पुर्ण होण्याची अपेक्षा प्रवाशांनी सोडून दिली आहे.

लोकलच्या वाढत्या गर्दीमुळं तरुणांना आपला जीव गमवावा लागतो आहे. प्रत्येक लोकल क्षमतेपेक्षा जास्त भरून प्रवाशांची वाहतूक करत आहे. त्यामुळं प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वी डोंबिवली स्थानकातील जीवघेण्या गर्दीनं एका तरूणीचा जीव घेतला आहे. त्यामुळं या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना मध्य रेल्वेच्या 'झोनल रेल्वे यूझर्स कन्स्लटिव्ह कमिटी'च्या (झेडआरयूसीसी) सदस्यांनी दिल्या आहेत.

सीएसएमटी येथे नुकतीच 'झेडआरयूसीसी'ची बैठक पार पडली. या बैठकीत याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. 'झेडआरयूसीसी'च्या सदस्या वंदना सोनावणे यांनी रेल्वेफेऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी रखडलेले प्रकल्प वेगानं पूर्ण करा, रुळांवरील फाटकांचं काम संबंधित महापालिका प्रशासनाच्या मागे लागून कामं करून घ्या, डोंबिवली येथून सुटणाऱ्या लोकल फेऱ्यांची संख्या वाढवा आणि लोकल वेळेत चालवा, अशी मागणी ही 'झेडआरयूसीसी' सदस्यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्याकडं केली.

याप्रकरणी, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्रालयाला यासंदर्भात एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी डोंबिवलीला येणारी लोकल ट्रेन ही कल्याणवरून सुटते. ही ट्रेन तिथूनच प्रवाशांच्या गर्दीनं भरून येत असल्यानं डोंबिवलीतील प्रवाशांना या ट्रेनमध्ये चढताच येत नाही. यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करूनही अद्याप तोडगा काढण्यात आलेला नाही. नियम ३७७ अंतर्गत तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींनुसार सुळे यांनी हा मुद्दा उपस्थित करून डोंबिवली स्थानकातून सुटणाऱ्या लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली.

दरम्यान, प्रवाशांच्या या मागण्यांवर येत्या काळात तोडगा निघून मध्य रेल्वे मार्गावरील प्रवास सुखाचा होणार का याकडं सर्व प्रवाशांचं लक्ष्य लागलं आहे.



हेही वाचा -

एअर इंडियाला खरेदीदार मिळेना, आयपीओद्वारे हिस्सा विकणार?

वाशी पूलाच्या विस्ताराला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा