मध्य रेल्वेनं प्रवाशांसाठी सोयीसकर असा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना आता रेल्वेनं लांब प्रवासाला निघताना त्यांच्यासोबत असलेलं लगेज वाहवून नेण्यासाठी टॅक्सीची शोधाशोध करीत रेल्वे टर्मिनस गाठण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे. यासाठी मध्य रेल्वेनं अभिनव अशी लगेज पिकअप सर्व्हीस सुरू केली आहे.
या महिन्याच्या अखेरीस ही सेवा प्रायोगिक तत्वावर नागपूरपासून सुरू होणार आहे. त्यामुळं प्रवासाला निघताना अवजड सामान सोबत घेऊन टॅक्सीनं रेल्वे स्टेशन गाठण्याची दगदग आता प्रवाशांना करावी लागणार नाही. मुंबईत देखील ही सुविधा मध्य रेल्वे लवकरच लागू करणार आहे.
प्रवासी त्यांच्या सोबतच्या बॅगा, किंवा इतर वस्तू पिकअप सर्व्हीसद्वारे काही फि भरून पार्सल करू शकणार आहेत. त्यामुळं या वस्तू गाडी सुटण्याच्या वेळेपूर्वीच पुरीयरद्वारे रवाना होत प्रवाशांच्या आसनांपर्यंत सुखरूपपणे पोहचतील अशी योजना आहे.
मध्य रेल्वेनं या सेवेसाठी दर देखील निश्चित केले आहे. पंचवीस किलोच्या बॅगेसाठी १० किलोमीटरच्या परिघापर्यंत १२५ रूपये आकारण्यात येणार आहेत. अंतराप्रमाणं या दरात वाढ होणार आहे. २० किलोमीटरसाठी ३०० रूपये, ३० किलोमीटरसाठी ४०० रूपये आणि ५० किलोमीटरसाठी ६०० रूपये आकारण्यात येणार असल्याची माहिती मिळते.