एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली. त्याच पार्श्वभूमीवर प्रवासी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आता महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांची नेमणूक केली आहे.
गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी २५१ गार्ड आणि ८ पर्यवेक्षकांना मध्य रेल्वेत नियुक्ती केल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी केली.
सीएसटीएम येथे झालेल्या कार्यक्रमात महाव्यवस्थापक शर्मा यांच्यासह महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे व्यवस्थापक संजय बर्वे आणि रेल्वे सुरक्षा बलाचे महानिरीक्षक अतुल श्रीवास्तव उपस्थित होते.
नाशिक येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या केंद्रात जवानांना प्राथिमक प्रशिक्षण देण्यात आलं आहे. गर्दीच्या वेळी स्थानकातील पादचारी पूल-प्लॅटफॉर्म येथे गार्डची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रेल्वे स्थानकातील सुरक्षेसंबंधी कामांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात येणार आहे. कायदेभंग करणाऱ्या प्रवाशांना पुढील कारवाईसाठी रेल्वे सुरक्षाबल आणि रेल्वे पोलीस यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांमुळे रेल्वेच्या सुरक्षेला बळ मिळेल, असा विश्वास महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला.