मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे-भिवंडी-कल्याण दरम्यान बांधल्या जाणाऱ्या मेट्रो-5 कॉरिडॉरचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याणपासून पुढे उल्हासनगरपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्यात येणार आहे.
एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यापासून मेट्रो-5 कॉरिडॉरच्या विस्ताराची प्रक्रिया सुरू होईल. कल्याण ते उल्हासनगर दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे सर्वेक्षण दोन महिन्यांत सुरू होणार आहे. सर्वेक्षणानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाईल. सरकारकडून डीपीआर मंजूर झाल्यानंतर बांधकाम होणार आहे. मेट्रोचा नवीन मार्ग सुमारे 8 किलोमीटर लांबीचा असेल. सध्या 24.9 किमी लांबीच्या मेट्रो मार्गाचे बांधकाम सुरू आहे.
मुंबईत पोहोचणे सोपे
कॉरिडॉरच्या विस्तारामुळे मुंबईहून उल्हासनगरला जाणाऱ्यांना तिसरा पर्यायही उपलब्ध होणार आहे. सध्या हा प्रवास रेल्वे किंवा रस्त्याने पूर्ण होतो. मेट्रो-5 कॉरिडॉर ठाण्यातील मेट्रो-4 कॉरिडॉरला जोडला जाणार आहे. वडाळा ते कासारवडवली दरम्यान मेट्रो-4चे काम सुरू आहे. एमएमआरडीए मेट्रो-4 सीएसएमटीपर्यंत विस्तारित करण्याच्या तयारीत आहे. मेट्रो-4 ही मेट्रो-1 घाटकोपरलाही जोडली जाणार आहे.
दोन मेट्रो कॉरिडॉरच्या कनेक्टिव्हिटीमुळे उल्हासनगरहून मेट्रो-5 मार्गे सीएसएमटी आणि वर्सोवा गाठणे सोपे होणार आहे. उल्हासनगरमध्ये कपडे, फर्निचर आणि इतर वस्तूंची मोठी बाजारपेठ आहे. येथे रोज हजारो लोक कामानिमित्त ये-जा करतात. मेट्रोच्या उभारणीमुळे येथील पर्यटकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
प्रकल्प स्थिती
कॉरिडॉरचे बांधकाम दोन टप्प्यात केले जात आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत ठाणे ते भिवंडी दरम्यानच्या उन्नत रस्त्याचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे दुसऱ्या टप्प्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. लोकांच्या विरोधामुळे एमएमआरडीएने दुसऱ्या टप्प्यातील सुमारे चार किमीचा रस्ता भूमिगत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भुयारी मार्गाला शासनाची मंजुरी न मिळाल्याने अद्यापही बांधकामाला सुरुवात झालेली नाही.
हेही वाचा