मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या खिशाला भविष्यात कात्री लागण्याची शक्यता आहे. कारण मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रवाशांची होणारी गर्दी आणि अॅपआधारित टॅक्सी सेवा आणि विमान सेवेच्या धर्तीवर उपनगरी रेल्वे भाडे दरांत बदल करण्याचा पर्याय मुंबई रेल्वे विकास महामंडळानं रेल्वे बोर्डाला सुचविला आहे. रेल्वे बोर्डाला सादर केलेल्या एकात्मिक तिकीट प्रणालीच्या प्रारूप आराखड्यात हा पर्याय सुचविण्यात आला आहे. मुंबई उपनगरी सेवेला वर्षांला १,७०० कोटी रुपयांचा तोटा होत होता. तसंच, हा तोटा मागील ३ वर्षांत ३ ते ४ हजार कोटी रुपयांवर गेला आहे. त्यामुळं तोटा कमी करण्यासाठी हा पर्याय शोधण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
सार्वजनिक परिवहन सेवांमधील प्रवासासाठी प्रवाशांना एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत एकच स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. त्यानुसार, संबंधित प्रत्येक विभागाकडून याची तयारी केली जात आहे. मुंबई उपनगरी रेल्वे प्रवाशांसाठीही सुविधा असल्यानं एमआरव्हीसी यावर काम करत असून यासंदर्भातील आराखडा बनवून रेल्वे बोर्डाकडं सादर करण्यात आला आहे.
एकात्मिक तिकीट प्रणाली सुविधा आल्यावर प्रथम ही सेवा यशस्वीरीत्या राबवण्याचा प्रयत्न एमआरव्हीसी, मध्य व पश्चिम रेल्वेकडून केला जाणार आहे. त्यानंतर, गर्दी आणि कमी गर्दीच्या वेळी भाडे दर निश्चित करण्याचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -
विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात ६२.५० रुपयांची कपात
कोहिनूर सीटीएनएलप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उन्मेष जोशी चौकशासाठी ईडीच्या रडारवर?