महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने (एसटी) आषाढी एखादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर दिली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी ३७८१ जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच यात्रेनंतर परतीच्या प्रवासावेळी प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी १० टक्के बस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ३ तात्पुरती बस स्थानकं उभारण्यात येणार आहेत.
शनिवारी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत झालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष रणजित सिंह देओल, वरिष्ठ अधिकारी आणि सर्व जिल्ह्यांचे विभाग नियंत्रक हे देखील उपस्थित होते.
२१ जुलै ते २८ जुलै या अषाढी एकादशीच्या काळामध्ये वारकरी आणि प्रवाशांचा प्रवास सरक्षित व्हावा, यासाठी एसटीचे ८ हजार कर्मचारी आहोरात्र सेवा पुरवणार आहेत. प्रवाशांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल.
दरवर्षी आषाढी एकादशीला मराठवाडा, खानदेशी आणि पश्चिम महाराष्ट्रासोबतच मुंबईतूनही मोठ्या प्रमाणात वारकरी आणि प्रवासी जातात. त्यामुळे प्रवाशांसाठी पंढरपूर इथं ३ तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. मराठवाडा येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी 'भिमा' बस स्थानक, मुंबई आणि पुणे इथं जाणाऱ्या प्रवाशांसाठी 'चंद्रभागनगर' बस स्थानक आणि जळगाव-नाशिक इथं जाणाऱ्या प्रवाशांसाठी 'विठ्ठल सहकारी साखर कारखाना' इथं बस स्थानक उभारण्यात येणार आहे.
आषाढी एकादशीच्या यात्रेनंतर परतीच्या प्रवासावेळी प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी १० टक्के बस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एस.टी. महामंडळाच्या WWW.msrtc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवाशांना त्यांच्या बसमधील सीट निश्चित करता येणार आहेत.
हेही वाचा-
मुंबईतील १३८ एसटी कर्मचाऱ्यांना संप महागात
Exclusive: वेतनवाढ नकोय तर लिहून द्या! दिवाकर रावते