महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा (एसटी)ची वाहतूक सेवा शनिवारी दुसऱ्या दिवशीही ठप्प आहे. वेतनवाढीच्या मुद्दयावर कर्मचारी ठाम असून जोपर्यंत योग्य वेतनवाढ लागू होत नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. या कामबंद आंदोलनामुंळ दुसऱ्या दिवशीही मुंबईसह राज्यभरातील आगारांवरील एसटी सेवा ठप्प आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून एसटीचंही मोठं आर्थिक नुकसान होत आहे.
कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन मागे घ्यावं यासाठी एसटी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले असतानाही कर्मचारी मात्र आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळं प्रशासनानं शुक्रवारपासूनच कर्मचाऱ्यांच निलंबन, कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करणं आणि त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
पण, त्यानंतरही आंदोलन सुरूच असल्यानं आता मात्र एसटी प्रशासनानं कडक भूमिका घेतली आहे. त्यानुसार १ जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांना जी वेतनवाढ देण्यात आली आहे तीच रद्द करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एसटीतील सूत्रांनी या वृत्ताला 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दुजोरा दिला आहे.
यावर तोडगा काढण्यासाठी अजूनही प्रशासनाकडून प्रयत्न सुरूच आहेत. त्याचाच भाग म्हणून दुपारी ३ वाजता मुंबई सेंट्रल इथं एसटीच्या महाव्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचंही समजतं आहे. त्यामुळे आता सर्वांचच लक्ष या बैठकीकडं लागलं आहे. ही बैठक यशस्वी ठरते की वेतनवाढ रद्द करण्याचा कठोर निर्णय प्रशासनाला घ्यावा लागतो हे थोड्याच वेळात समजेल.
हेही वाचा-
संपामुळं एसटीचं १५ कोटींचं नुकसान
Exclusive: वेतनवाढ नकोय तर लिहून द्या! दिवाकर रावते