गुरूवारी मध्यरात्री अचानक मुंबईसह राज्यभरातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा (एसटी)च्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं असून कर्मचारी गाड्या रोखत आहे. ही बाब लक्षात घेता हे आंदोलन बेकायदेशीर असल्याचं म्हणत एसटी प्रशासनानं ठाणे अगारातील ४ आणि उस्मानाबाद आगारातील १४ अशा एकूण १८ कर्मचाऱ्यांचं तात्काळ निलंबन केलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा प्रवाशांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये म्हणून या प्रवाशांसाठी राज्य सरकारकडून विशेष सोय करण्यात येत आहे. राज्य सरकारने अधिसूचना काढून प्रवाशांना व्यावसायिक, बिगरप्रवासी वाहनांतून प्रवाशांची वाहतूक करण्यास मुभा देण्यात आली आहे. नवीन भरतीतील जे कर्मचारी संपादरम्यान कामावर हजर राहिलेले नाही, त्यांना उद्यापासून कामावर येऊ नयेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
- दिवाकर रावते, परिवहनमंत्री
एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन खूपच कमी असून वेतनवाढ करावी या मागणीसाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून कर्मचारी आंदोलन करत आहेत. एेन दिवाळीत कर्मचाऱ्यांनी संपावर जात प्रवाशांना चांगलंच कोंडीत पकडलं होतं. अखेर हे प्रकरण न्यायालयापर्यंत आणि न्यायालयानं हा संप बेकायदेशीर ठरवत संपकऱ्यांना दणका दिल्यानंतर तब्बल ५ दिवसानंतर संप मागे घेण्यात आला. मात्र त्यानंतरही वेतनवाढीचा 'प्रश्न जैसे था' होता.
मात्र, एसटीच्या ७० व्या वर्धापनदिनी, १ जूनला प्रशासनाच्या वतीने कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात आली. ही वेतनवाढ चांगली असल्याची चर्चा होती. पण काही कर्मचाऱ्यांनी आणि संघनटनांनी मात्र ही वेतनवाढ फसवी असल्याचं म्हणत अघोषित संप पुकारला. एसटीतील कोणत्याही अधिकृत संघटनेनं हा संप पुकारलेला नसून कर्मचारी स्वयंस्फूर्तीनं कामबंद आंदोलन करत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा संप बेकायदेशीर असल्याचं 'मुंबई लाइव्ह'ला सांगत तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट केलं.
एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी मोठी वेतनवाढ देण्यात आलेली असताना, कर्मचारी का नाराज आहेत? हे समजण्यापलिकडचं आहे. हे कामबंद आंदोलन निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन करण्यात येत आहे. या संपाच्या मागे नेमकं कोण आहे, हे आताच सांगता येणार नाही.
- श्रीरंग बर्गे, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस
या कामबंद आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी परळ आगारातून गुरूवारी मध्यरात्रीपासून एकही गाडी सोडू दिलेली नाही. तर सकाळी मुरूडला निघालेली एसटी परळ आगारात घुसू दिली नाही. त्यामुळं चिडलेल्या प्रवाशांनी एसटीविरोधात संताप व्यक्त करत आपली तिकीटाची रक्कम परत घेतली. परळ आगारात दगडफेकीच्याही घटना घडल्या असून ठाण्यासह राज्यभर एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
आक्रमक कर्मचारी बेकायदेशीर कृत्य करत असल्याचं म्हणत एसटी प्रशासनानं शुक्रवारी दुपारी कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार एसटी प्रशासनाकडून कामावर हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतरही कामावर हजर न राहणाऱ्या ठाणे आगारातील ४ आणि उस्मनाबाद आगारातील १४ कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करत त्यांच्याविरोधात एसटी प्रशासनानं गुन्हा दाखल केला आहे. सोबतच परळ आगारातील ३ जणांनाही ताब्यात घेतल्याची माहिती मिळत असून त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. कर्मचाऱ्यांच्या अटकेमुळे हे आंदोलन चिघळण्याचीही शक्यता आता व्यक्त होत आहे.
हेही वाचा-
एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचं गिफ्ट
अखेर एसटीची १८ टक्के भाडेवाढ, १५ जूनच्या मध्यरात्रीपासून होणार लागू