दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दिवसाला अनेकजण कोरोनाबधित आढळत आहेत. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून मास्क न घालणाऱ्यां विरोधात दिल्लीत २००० रुपये दंड आकारला जात आहे. दिल्लीपाठोपाठ मुंबईतही परिस्थिती चिंताजनक होताना दिसत आहे. तब्बल ५ महिन्यानंतर मुंबईतील रुग्णसंख्या वाढली असून, दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याच्या निर्णय आणखी लांबणीवर पडणार असल्याचं स्पष्टीकरण महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिलं आहे.
महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुंबईतील कोरोना परिस्थितीविषयी माहिती दिली. मुंबईत वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर चहल यांनी चिंता व्यक्त केली आहे.
'मुंबईसाठी पुढील ३ ते ४ आठवडे खूप महत्त्वाचे आहेत. मात्र, मुंबईत कोणत्याही प्रकारचं निर्बंध लागू करण्यात येणार नाही. ३ ते ४ आठवड्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतरच निर्णय घेतला जाणार आहे. जलतरण तलाव (स्वीमिंग पूल), शाळा आणि रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आलं होतं. मात्र, आता या तिन्ही गोष्टी बंद राहतील. इतर ठिकाणावर सध्या कोणताही परिणाम होणार नाही' असं स्पष्टीकरण महापालिका आयुक्त चहल यांनी दिलं.