एकीकडे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी संपावर असताना आता ओला-उबर चालकांनीही मंगळवारी मध्यरात्रीपासून मुंबईत संप पुकारला आहे. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत.
अंदाजे 25 हजार ओला-उबर चालक संपावर गेले आहेत. ओला आणि उबर ही कंपनी ग्राहकांसाठी उत्तम सेवा पुरवते. पण चालकांसाठी मात्र कोणत्याच सेवा-सुविधा पुरवत नसल्याची तक्रार करत ओला-उबरच्या चालकांनी संप पुकारला आहे. हा संप आणखी काही काळ असाच सुरू राहिला, तर प्रवाशांचे आणखी हाल होतील.
ओला उबरने महिन्याला सव्वा लाखाचा धंदा देण्याचे अमिष दाखवल्याने अनेकांनी कर्ज काढत गाड्या विकत घेतल्या आणि ओला उबर कंपनीला जोडल्या. पण त्यांना आता सव्वा लाख दूरच 50 हजारांचा धंदाही होत नाही. त्यामुळे ओला उबर चालक आर्थिक संकटात अडकले आहेत.
या संपात सहभागी न झालेल्या चालकांनी आपल्या गाड्या रस्त्यावर उतरवल्या आहेत. त्यामुळे संप पुकारलेल्या चालकांकडून प्रवाशांना धमकी आणि त्या गाड्याही अडवल्या जात असल्याचे समजते आहे.
आमचा संप शांततेत सुरू आहे. काही वाहन चालक अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने गाड्या अडवत असतील, प्रवाशांना धमकावत असतील तर ते योग्य नाही. त्यांच्यावर नक्कीच पोलिसांनी आवश्यक ती कारवाई करावी. आमचे पुन्हा एकदा चालकांना आवाहन आहे की, त्यांनी हा संप शांततेत सुरू ठेवावा.
- के. के. मिश्रा, पदाधिकारी, स्वाभिमानी टॅक्सी रिक्षा चालक-मालक संघटना
मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता यासंदर्भात बैठक होणार आहे. जर यातून काही तोडगा निघाला नाही तर संप सुरूच ठेवणार असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.
हेही वाचा -
शुक्रवारपासून ओला, उबेरचा बेमुदत संप
ओला, उबेर टॅक्सींसाठी सरकारचे नवे नियम