पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशी संख्येत वाढ झाली आहे. लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या लोकलमध्ये अत्यावश्यक सेवेतील विविध श्रेणींना लोकल प्रवासाची परवानगी दिल्यानंतर पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील १५ दिवसांत ६६ हजार प्रवाशांची भर पडल्याने दररोजच्या प्रवाशांची संख्या ८ लाखांपार गेली आहे.
मार्च महिन्यात सामान्य प्रवाशांसाठी बंद असलेली लोकल सेवा जून महिन्यापासून अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरू झाली. विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी दिल्यानंतर लोकल प्रवाशांत हळूहळू वाढ होऊ लागली. सध्या सर्वासाठी लोकल खुली नसली तरीही अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांची उपस्थिती १०० टक्के झाली आहे.
मागील १५ दिवसांत तर प्रवासी संख्येत मोठी भर पडली आहे. २३ डिसेंबर २०२० मध्ये ७ लाख ५९ हजार ३७८ प्रवासी प्रवास करत होते. ६ जानेवारी २०२१ पर्यंत हीच संख्या ८ लाख २५ हजार ३८३ झाल्याची माहिती देण्यात आली.
लॉकडाऊनपूर्वी पश्चिम रेल्वेवर दररोज १ हजार ३६७ फेऱ्या होत होत्या. आता याच फेऱ्यांची संख्या १,२०१ आहे. प्रवासी संख्या वाढत असल्याने या फेऱ्यांत काहीशी वाढ करण्याचाही विचार केला जात आहे.