एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. एसटी महामंडळाने पूर्ण क्षमतेने वाहतुक सेवा सुरू केल्यानंतर ही वाढ झाली आहे. त्याशिवाय, ५ दिवसांत १ लाख प्रवाशांची भर पडली आहे. मुंबई आणि औरंगाबाद प्रदेशातून सर्वाधिक प्रवास होत आहे. लॉकडाऊनंतर १८ सप्टेंबरपासून पूर्ण प्रवासी क्षमतेने एसटी धावू लागल्या.
१७ सप्टेंबरला ४ हजार ४१० बसगाड्यांच्या १६ हजार ३४७ फेऱ्या चालवण्यात आल्या होत्या. यातून ४ लाख ९० हजार ७३८ प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे. २२ सप्टेंबरला ४ हजार ८८५ गाडय़ांच्या १७ हजार २४४ फेऱ्या झाल्या. यामधूनही ५ लाख ९७ हजार ६३५ प्रवाशांनी प्रवास केला आहे. ५ दिवसांत १ लाख ६ हजार ८९७ प्रवाशांची भर पडली.
मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे या मुंबई प्रदेशातून १ लाख ३८ हजार ८४२ प्रवाशांनी, तर औरंगाबाद, बीड, जालना,लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या औरंगाबाद प्रदेशातून १ लाख ६८ हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यानंतर पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या पुणे प्रदेशात, तर नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर यासह राज्याच्या अन्य भागांतूनही प्रवास होत आहे.