Advertisement

हतबल प्रवासी आणि सुस्त प्रशासन, 'मरे' कधी होणार सुरळीत?


हतबल प्रवासी आणि सुस्त प्रशासन, 'मरे' कधी होणार सुरळीत?
SHARES

लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. पण सध्यस्थितीत या लोकलला 'टाईमलाईन'चं उरलेला नाही. याचं मुळं कारण म्हणजे वारंवार लोकल वाहतूक विस्कळीत होणं. रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गावरून दररोज लाखो  प्रवासी प्रवास करतात. परंतु, मध्य आणि हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आठवड्यातील ७ दिवसांपैकी ५ दिवस तरी लोकल विस्कळीत होऊन त्रासाला सामोरं जावं लागतं. लोकल सतत विस्कळीत होत असल्यानं प्रवाशीही प्रचंड हैराण झाले आहेत. याबाबत अनेकदा तक्रार करूनही प्रवाशांचा त्रास काही कमी झालेला दिसत नाही. 

प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा यासाठी प्रशासन नेहमीच प्रयत्न करत असल्याचा दावा मध्य रेल्वे करत आली आहे. मात्र, सिग्नल यंत्रणेत बिघाड, रेल्वे रुळांना तडा, ओव्हरहेड वायर तुटणं यांसारख्या अनेक घटना सतत घडत असल्यामुळं मध्य रेल्वेचा हा दावा खोटा ठरत आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) अंतर्गत अनेक प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु, या प्रकल्पांना गती मिळत नसल्यामुळं रेल्वे प्रवाशांच्या त्रासात आणखी भर पडत आहे.

रेल्वे प्रकल्प रखडल्यामुळं मध्य रेल्वे मार्गावरील अनेक मार्गिकांचं काम खोळंबलं आहे. परिणामी लोकल आणि मेल-एक्स्प्रेस एकाच मार्गिकेतून धावत आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळाचा ठाणे-दिवा पाचवी व सहावी मार्गिका हा महत्त्वाचा प्रकल्प रखडत असल्याने हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत जलद मार्गावरील लोकल विलंबानंच धावतील. २००८ मध्ये मंजूर झालेली ठाणे ते दिवा पाचवी-सहावी मार्गिका अद्याप तयार झालेली नाही. त्यामुळं ठाणे ते दिवा दरम्यान मेल-एक्स्प्रेस, अप-डाऊन जलद मार्गावरील लोकल एकाच मार्गिकेतून धावतात. याचा फटका जलद मार्गावरील लोकल फेऱ्यांना बसतो.

मेल-एक्सप्रेसच्या वेळेत अनेक लोकलला २ स्थानकांमध्ये अथवा स्थानकात थांबा दिला जातो. कल्याण स्थानकातून मेल-एक्स्प्रेस क्रॉस होताना अतिरिक्त मार्गिका नसल्याने स्थानकाबाहेरच लोकल थांबवावी लागते. हे टाळण्यासाठी कल्याण यार्डाचा नूतनीकरण प्रकल्प प्रस्तावित आहे. कसारा आणि कर्जतहून सुटणाऱ्या लोकल वेळेत सीएसएमटीसाठी रवाना होतात. मात्र, कल्याण स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी थांबत असल्यानं हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. तसंच, १५ ते २० मिनिटं उशिरा असल्यामुळं स्थानकात प्रवाशाची प्रचंड गर्दी जमते  आणि गर्दीतून लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना धक्काबुक्की सहन करावी लागते.

या धक्काबुक्कीमुळं अनेकांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत, तर काहींना कायमचं अपंगत्व आलं आहे. आजही मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळं 'पाचवी आणि सहावी मार्गिका नाहीत तर मेल चालवू नका व गाड्या वाढवू नका' असं मत उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संघाचे (महासंघ) अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना व्यक्त केलं. तसंच, 'दर रविवारी रेल्वे रुळांच्या आणि इतर कामांच्या बांधकामांसाठी मेगाब्लॉक घेतला जातो. मात्र, वारंवार मेगाब्लॉक घेऊनही मध्य रेल्वेचे वाहतूक सुरळीत का चालत नाही?’ असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

लोकल फेऱ्या कमी आणि प्रवासी जास्त यामुळं मध्य रेल्वेचं गणित कोलमडतं. त्याशिवाय, मागील अनेक वर्षांपासून मध्य रेल्वेची ओळख ही 'रोज मरे त्याला कोण रडे' अशी आहे. बदलत्या काळानुसार आधुनिक यंत्रणा येऊनही मध्य रेल्वेची अवस्था काही सुधारली नाही. मध्य रेल्वेवर प्रवाशांची गर्दी इतकी वाढली आहे की, प्रवासी विनातिकीट आणि बिनधास्त प्रथम दर्जाच्या डब्यातून प्रवास करतात. तर काही प्रवासी मालवाहतुकीच्या डब्यातून प्रवास करतात. त्याचप्रमाणं, सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्यावेळी लोकलच्या फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास डब्यातला फरक समजत नाही. प्रवाशांना सहन कराव्या लागणाऱ्या या सर्व समस्या लक्षात घेऊन अनेकदा प्रवासी आणि प्रवासी संघटना रेल रोको आंदोलनं करतात. परंतु, त्यांची ही आंदोलनंही रेल्वे प्रशासनाच्या कारभारासमोर कुचकामी ठरत आहेत.

 आंदोलनाचा इशारा

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना सतत लेटमार्कला सामोरं जावं लागतं असल्यामुळं यावर तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन आणि मुंबई उपनगरीय मार्गावरील १५ प्रवासी संघटनांची २६ जून रोजी बैठक झाली होती. ही बैठक तब्बल ३.३० तास चालली. बैठकीत मध्य रेल्वेनं मुंबई उपनगरी लोकल पूर्णपणे वेळेवर धावण्यासाठी किमान १०० दिवसांचा कालावधी अपेक्षित असल्याचं म्हटलं होतं. या बैठकीमध्ये मध्य रेल्वे प्रशासनानं मान्सून तयारी, उन्हाळी विशेष मेल, एक्स्प्रेस आणि तांत्रिक बिघाडामुळं मध्य रेल्वे उशीरानं चालविण्यात येत असल्याचं स्पष्टीकरण प्रवासी संघटनेला दिलं होतं

मध्य रेल्वेनं दिलेल्या या अल्टिमेटमनुसार, गुरूवारी २६ सप्टेंबर रोजी ९० दिवस पूर्ण झाले असून, मध्य रेल्वेची वाहतूक अद्याप विस्कळीत आहे. त्यामुळं १०० दिवसांनंतर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संघाचे (महासंघअध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली. 

या आंदोलनादरम्यान सीएसएमटी येथील आझाद मैदानात पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. तसंच, मध्य रेल्वेच्या कारभाराबाबत ४ पानी पत्र या प्रवासी संघटनेनं कलेक्टर, पोलीस कमिशनर, रेल्वे मंत्री, चेअरमन, डी.आर.एम. आणि मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. त्यामुळं १०० दिवस झाल्यावर प्रवासी संघटना रेल्वेच्या ढिसाळ कारभाराबाबत आंदोलन करणार आहेत. 



हेही वाचा -

एलआयसी भरती : हिंदीच्या सक्तीला मनसेचा विरोध

पवारांनी मानले शिवसेनेचे आभार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा