आझाद- रेल्वेने आयआरटीसीच्या माध्यमातून प्रवाशांना जेवणाची सुविधा पुरविणाऱ्या 318 कॅटरिंग कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढले. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर घ्यावे या मागणीसाठी आझाद मैदानात सोमवारी धरणे आंदोलन केले. कामावरून कपात करण्यात आलेले 318 कर्मचारी हे रेल्वेच्या कॅटरिंग सेवेत 27 फेब्रुवारी 2009 पासून कार्यरत होते. हे कर्मचारी राजधानी आणि ऑगस्टक्रांती रेल्वेत प्रवाशांना जेवणाची सुविधा पुरवत होते. 19 डिसेंबर 2016 रोजी या गाड्यांतील पॅन्ट्री कारमधून 318 कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आल्याचे सांगण्यात आले. कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढण्यात आल्याने कर्मचारी हतबल झाले आहेत. या कर्मचाऱ्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडेदेखील पुन्हा कामावर घेण्यासाठी लेखी निवेदन दिले आहे.
आमचा रोजगार पूर्ववत करावा, आम्हाला नोकरीत रुजू करावे, या मागणीसाठी हे कर्माचारी रस्त्यावर उतरले. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आपल्या फायद्यासाठी नवीन कोणताही अनुभव नसलेल्या ठेकेदारांच्या कामगारांकडून काम करून घेत असल्याचा आरोप आयआरटीसी डिपार्टमेंटल कॅटरिंग काँट्रॅक्टर एम्पलॉइज असोसिएशन मुंबईचे उपाध्यक्ष सैय्यद शेख यांनी केला आहे.