मुंबईत उपनगरीय लोकलचा प्रवास आणखी सुखकर होण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पुढाकार घेतला आहे. सचिनने मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी वेगळा झोन तयार करण्याची मागणी केली आहे. सचिनने केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून त्यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला आहे.
मुंबई उपनगरीय रेल नेटवर्कवर जवळपास ७५ लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. त्यामुळे उपनगरीय लोकल सेवेचे अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन व्हावे, यासाठी सचिनने ही मागणी केली आहे.
मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कसाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी सचिनने केली आहे. या महामंडळाला स्वायत्तता देण्यात यावी, भारतीय रेल्वेच्या नियंत्रणाखाली त्यांचा कारभार नसावा असे सचिनने पत्रात म्हटले आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेचे एकत्रिकरण झाल्यास निर्णयप्रक्रियेला वेग येईल, तसेच नागरी सुविधेचे अनेक प्रकल्प वेगाने मार्गी लागतील, असं सचिनने पत्रात नमूद केलं आहे.
मी जो प्रस्ताव ठेवलाय, त्याच्या अंमलबजावणीत अडथळे असले, तरी तुम्ही माझ्या मागणीला पाठिंबा द्याल, याची मला खात्री आहे, असेही सचिनने या पत्रात म्हटले आहे. ११ डिसेंबर २൦१५ ला राज्यसभेत रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी सचिनच्या रेल्वे संबंधीच्या या प्रश्नाला उत्तर दिले होते. तर, सचिनचा हा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठवण्यात आल्याची प्रतिक्रिया रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे.