गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील चाकरमान्यांना कोकणात सहजरीत्या जाता यावे म्हणून राज्य परिवहन विभागाकडून जादा 'एसटी' बस चालवल्या जातात. त्यानुसार 'एसटी' महामंडळाने प्रत्येक जिल्ह्याच्या आगारातून मुंबई विभागासाठी जादा बस मागवल्या आहेत. मात्र बाहेरून आलेल्या जादा बसच्या चालक, वाहकांची गैरसोय होत असल्याने या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून 'काम बंद' चा इशारा आहे. यामुळे ऐन गणेशोत्सवात 'एसटी'ने गावी पोहोचण्याच्या तयारीत असलेल्या चाकरमान्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवसाठी कुर्ला, नेहरूनगर आगारात एसटी महामंडळाने प्रत्येक जिल्ह्याच्या आगारातून ४७६ जादा बस मागवल्या आहेत. या बस कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मागवण्यात आल्या आहेत. मात्र एसटी महामंडळाने मुंबईबाहेरून आलेल्या या बस चालक आणि वाहकांची कुठलीही सोय केलेली नाही. त्यामुळे हे चालक आणि वाहक त्रासले आहेत.
शेकडो प्रवाशांना गावी सोडण्याची जबाबदारी असलेल्या या वाहक आणि चालकांना झोपण्यासाठी पुरेशी जागाही एसटी महामंडळाने उपलब्ध करून दिलेली नाही. निकृष्ट दर्जाची जेवण व्यवस्था, अपुरे आणि अस्वच्छ स्वच्छतागृह यामुळे या कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
मुंबईत आल्यानंतर एसटी महामंडळाने वाहक, चालकांच्या वाढलेल्या संख्येनुसार या सर्व सेवा कुर्ला आगारात किंवा इतरत्र उपलब्ध करून देणे आवश्यक होते. परंतु महामंडळाने या कर्मचाऱ्यांच्या गैरसोईंची साधी दखल न घेतल्याने या एसटी चालक, वाहकांनी नाईलाजास्तव संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
हे देखील वाचा -
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)