एअर इंडियावर (Air India) टाटा (TATA) समूहाची मालकी प्रस्थापित होणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. पण केंद्र सरकारकडून मात्र या वृत्ताचं खंडन करण्यात आलं आहे. टाटा समूहाची मालकी प्रस्थापित झाल्याचं वृत्त चुकीचं असल्याची भूमिका केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आली आहे.
केंद्रीय प्रसिद्धी विभागानं ट्वीटरवर यासंदर्भात खुलासा केला आहे. “केंद्र सरकारनं एअर इंडियासाठी लावण्यात आलेली बोली स्विकारल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. मात्र, हे वृत्त चुकीचं असून जेव्हा तसा निर्णय घेतला जाईल, तेव्हा केंद्र सरकारकडून कळवण्यात येईल”, अशी माहिती ट्वीटरवरून देण्यता आली आहे.
Media reports indicating approval of financial bids by Government of India in the AI disinvestment case are incorrect. Media will be informed of the Government decision as and when it is taken. pic.twitter.com/PVMgJdDixS
— Secretary, DIPAM (@SecyDIPAM) October 1, 2021
देशातील टाटा सन्सकडे पुन्हा एकदा एअर इंडियाची मालकी आली असल्याचं वृत्त समोर आलं होतं. एअर इंडियावरील मालकी हक्कासाठी चार निविदा आल्या होत्या. त्यामध्ये टाटा सन्ससोबत स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग हे देखील स्पर्धेत होते. मात्र, शेवटी टाटा सन्सनं बाजी मारली अशी चर्चा होती.
सध्या एअर इंडियावर ६० हजार ०७४ कोटी रुपयांचं कर्ज आहे. मात्र खरेदी करणाऱ्या कंपनीला २३,२८६.५ कोटी द्यावे लागणार आहेत. उर्वरित कर्ज विशेषतः तयार केलेल्या एअर इंडिया अॅसेट होल्डिंग्स लिमिटेडला हस्तांतरित केले जाईल. याचा अर्थ उर्वरित कर्ज परत फेडण्याचा भार केंद्र सरकार उचलणार आहे.
टाटा समूहानं १९३२ मध्ये टाटा एअरलाइन्स या नावाने एअर इंडियाची सुरुवात केली होती. त्यानंतर भारत सरकारनं १९५३ साली ताब्यात घेतली होती. एअर इंडिया विकण्याची प्रक्रिया जानेवारी २०२० पासून सुरू झाली होती. मात्र कोरोना संकटामुळे यात विलंब झाला.
एप्रिल २०२१ मध्ये सरकारनं पुन्हा एकदा कंपन्यांना बोली लावण्याचा प्रस्ताव दिला. २०२० या वर्षात देखील टाटा ग्रुपनं एअर इंडिया खरेदीसाठी प्रस्ताव दिला होता. यापूर्वी २०१७ मध्ये सरकारनं एअर इंडियाचा लिलाव सुरू केला होता. मात्र तेव्हा कोणत्याही कंपनी स्वारस्य दाखवलं नव्हतं.
हेही वाचा