मुंब्रा (mumbra) येथे झालेल्या जीवघेण्या अपघातानंतर सरकार आता लोकलच्या नियोजनासाठी पाऊल उचलताना दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकलला स्वयंचलित दरवाजे (automatic door) बसवणार असल्याचे म्हटले होते. तर आता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आता मोठी घोषणा केली आहे.
येत्या तीन वर्षांत मुंबई लोकलच्या फेऱ्या दुप्पट करणार असल्याचे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुकर होण्याची शक्यता आहे. एका खाजगी वृत्तपत्राशी संवाद साधताना रेल्वेमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रासाठी (maharashtra) रेल्वे विभागाने यंदा 81 हजार कोटींची तरतूद केली आहे.
यात एकट्या मुंबई व एमएमआरमध्ये (mmr) सध्या 16 हजार कोटींची कामे सुरू आहेत. तर मुंबईतील (mumbai) सर्व लोकल ट्रेनना स्वयंचलित दरवाजे बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये या स्वयंचलित दरवाजांच्या प्रणालीसोबत पहिल्या लोकलची चाचणी केली जाणार आहे.
पण सर्वच लोकल एसी (AC local) करण्याला राजकीय विरोध झाला आहे, तरी आपण जास्तीत जास्त गाड्या वातानुकुलित करण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही अश्विनी वैष्णव यांनी नमूद केले.
वैष्णव पुढे म्हणाले, मुंबईत सध्या एकूण 3200 फेऱ्या दररोज सुरु आहेत. त्या फेऱ्या आणखी वाढवण्याच्या हेतूने प्रयत्न सुरू आहे. टप्याटप्याने सुमारे 300 अतिरिक्त लोकल ट्रेन सोडल्या जातील, लोकलची संख्या वाढविण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे प्रवास सुकर होईल.
तसेच मुंबईतील दोन लोकलमधील अंतर हे चार मिनिटांवरुन अडीच मिनिटांवर आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करणार आहोत, जे करणारं मुंबई हे पहिलंच शहर ठरणार आहे.
रेल्वेमंत्र्यांनी असेही नमूद केले की, रेल्वे मार्गावरील तांत्रिक अडचणी दूर करुन तिन्ही मार्गांवरील लोकलला कवच प्रणालीसोबत कम्बाइन कम्युनिकेशन बेस्ड कंट्रोल ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) यंत्रणेशी जोडण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे तीन वर्षांत लोकल फेऱ्या दुप्पट होतील.
हेही वाचा