मुंबई - 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा टोलनाक्यांवर घेतल्या जात नसल्याने प्रवाशांत संतापाचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे मुंबईहून जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या मार्गांवर सकाळपासून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना अनेक तास वाहतूक कोंडीत ताटकळावं लागलं.
आठवड्याभरासाठी टोलमाफी द्या
या निर्णयामुळे बँका, एटीएम बंद आहेत, त्यामुळे प्रवासी, वाहन-चालकांची मोठी गैरसोय होतेय. त्यामुळे पुढचा आठवडाभर सी लिंकसह राज्यभरातल्या टोलनाक्यांवर टोलमाफी द्यावी, अशी मागणी टोल अभ्यासक विवेक वेलणकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे बुधवारी ही मागणी केल्याची माहिती वेलणकर यांनी मुंबई लाइव्हला दिली.