कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारनं कडक निर्बंधांची घोषणा केली. या कडक निर्बंधांमुळे सर्वसामान्यांना आपल्या खिसा रिकामी करावा लागत आहे. याच कारण म्हणजे बंद असलेली मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा आणि वाढलेले पेट्रोलचे भाव. त्यामुळं लवकरात लवकर लोकल प्रवास सुरु करावा अशी मागणी सर्वसामान्य करत आहेत.
लोकल वाहतूक बंद असल्यामुळं सर्वसामान्यांना मोठ्या आर्थिक संकटातून जावं लागतंय. कारण महिन्याच्या आर्थिक खर्चात प्रवासाचा खर्च वाढल्यानं आता खायचं कसं आणि भविष्यासाठी बचत कशी करायची असा प्रश्न या नागरिकांना सतावत आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकृतपणे सर्वसामान्यांना लोकलमुभा नसली तरी परवानगी नसताना असंख्य नागरिक मुंबई लोकलने प्रवास करताहेत. जूनच्या पहिल्या पंधरवड्याअखेर मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवासी संख्या ३१ लाखांपर्यंत पोहोचली आहे. रोजगाराची चिंता सतावत असताना प्रवास खर्च कमी करण्यासाठी अनेक नागरिक लोकल प्रवासाला प्राधान्य देताना दिसत आहेत.
पेट्रोलच्या शंभरी ओलांडल्यामुळे १५ ते २० हजार रुपये पगार कमावणाऱ्या सामान्य मुंबईकरांना दुचाकीचा रोजचा खर्च परवडत नाही. घराचे हप्ते, वाढलेला इंटरनेट खर्च, दैनंदिन घरखर्च ही वाढत असल्याने अर्थव्यवहार सांभाळताना गृहिणींची मोठी ओढाताण होत आहे. या सर्व स्थितीवर सरकारकडून केवळ बघ्याची भूमिका घेण्यात येत आहे.
कल्याण-डोंबिवलीहून मुंबई गाठण्यासाठी साधारणपणे ४०० रुपये खर्च होतो. लोकलने हाच प्रवास २० रुपयांत पूर्ण होतो. शिवाय रस्तेमार्गे हे अंतर कापण्यासाठी २ ते ३ तास लागतात. त्यामुळं सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी मुंबईकरांमधून होत आहे.