राज्यातील मध्य रेल्वेवरील नवीन रेल्वे मार्गिका, दुहेरीकरण, तिसऱ्या व चौथ्या मार्गिकांच्या कामांसाठी ५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची तरतूद २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यात वर्धा ते नांदेड नव्या मार्गिकेला ८२० कोटी रुपये आणि पुणे ते मिरज, लोंढा या दुहेरीकरणाच्या कामाला १ हजार ५६७ कोटी रुपये निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गिकांसह अन्य कामांना गती मिळणार आहे.
- अहमदनगर ते बीड ते परळी वैजनाथ या २५० किलोमीटरच्या नवीन मार्गिकेच्या कामासाठी ५६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- वर्धा ते नांदेड (व्हाया यवतमाळ-पुसद) या २७० किलोमीटरच्या नवीन मार्गिकेलाही ८२० कोटी रुपये मिळाले असून चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात ३४७ कोटी रुपये निधी मिळाल्याने मध्य रेल्वेला प्रकल्पाचे पुढील काम करण्यास मदत मिळाली होती.
- वर्धा ते यवतमाळ या ७८ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे.
- वर्धा ते नांदेड रेल्वे मार्गाकरिता ४८.४८ हेक्टर जमीन शेतकऱ्यांकडून संपादित करावयाची आहे.
- अर्थसंकल्पातून यंदा पुणे ते मिरज ते लोंढा ४६७ किलोमीटर दुहेरीकरणासाठी १ हजार ५६७ कोटी रुपयांचा भरघोस निधी दिला आहे.
- दक्षिण मध्य रेल्वेतर्फे लोंढा ते मिरज या १९० किलोमीटर लांबीच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण गेल्या वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.
नव्या मार्गिकांसाठी किती?
- सोलापूर ते उस्मानाबाद व्हाया तुळजापूर नवीन मार्गिकेसाठी १० कोटी रुपये.
- कल्याण ते मुरबाड व्हाया उल्हासनगर ५ कोटी रुपये.
- धुळे ते नदार्ना ५० कोटी रुपये.
- वर्धा ते नागपूर तिसरी मार्गिका ८७ कोटी.
- वर्धा ते बल्लारशहा तिसरी मार्गिका ३०५ कोटी रुपये.
- इटारसी ते नागपूर ६१० कोटी रुपये.
- दौंड ते मनमाड दुहेरीकरण ५०० कोटी रुपये.
- वर्धा ते नागपूर चौथी मार्गिका १३० कोटी रुपये.
- मनमाड ते जळगाव तिसरी मार्गिका २०५ कोटी रुपये.
- जळगाव ते भुसावळ चौथी मार्गिका ५५ कोटी रुपये.
- कल्याण ते कसारा तिसऱ्या मार्गिकेसाठी १६० कोटी रुपये.