कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील बंदी वाढवली आहे. ३१ जुलै २०२० पर्यंत ही बंदी वाढवण्यात आली आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर १५ जुलै २०२० पर्यंत बंदी घातली होती. देशात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यात अद्याप यश आलेले नाही. या
पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील बंदी ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे, असं डीजीसीएने म्हटलं आहे. मात्र, हा नियम आंतरराष्ट्रीय मालवाहतूक आणि डीजीसीएमार्फत सुट देण्यात आलेल्या उड्डाणांना लागू होणार नाही.
देशांतर्गत उड्डाणे सुरू झाल्यानंतर आता केंद्र सरकार लवकरच आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेईल, अशी शक्यता काही दिवसांपासून व्यक्त केली जात होती. मात्र, या सर्व चर्चांना डीजीसीएने पूर्णविराम लावला आहे. डीजीसीएच्या निर्णयानंतर ३१ जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार नाही. केवळ आंतरराष्ट्रीय मालवाहतूक तसंच वंदे भारत अभियान अंतर्गत उड्डाणांना परवानगी आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार सरकारने 'वंदे भारत' मोहिमेअंतर्गत ३.६ लाखाहून अधिक भारतीयांना परदेशातून परत आणलं आहे.