कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून देशात 21 दिवसांचा लाॅकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. यामुळे देशातील उद्योग-धंदे ठप्प झाले आहेत. लाॅकडाऊन संपल्यानंतर देशात अनेकांच्या नोकऱ्या जाणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. लाॅकडाऊननंतर भारतातील नोकऱ्यांची परिस्थिती काय असेल याचा अंदाज घेण्यासाठी भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय) अलीकडेच अनेक उद्योग क्षेत्रातील 200 हून अधिक मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांचे ऑनलाइन सर्वेक्षण केले.
सीआयआयच्या या ऑनलाइन सर्वेक्षणात 52 टक्के सीईओंनी लाॅकडाऊननंतर
नोकरी गमावण्याची शक्यता वर्तवली आहे. तथापि, 46 टक्के सीईओ म्हणाले की, नोकऱ्यांमध्ये कपात होणार नाही. उर्वरित 2 टक्के लोकांना आगामी परिस्थितीबद्दल खात्री नाही. सीईओंनी असंही म्हटलं की, लॉकडाऊननंतर जवळपास 52 टक्के सीईओ आपापल्या क्षेत्रात नोकऱ्या जाण्याची भिती व्यक्त केली आहे. तर 47 टक्के कंपन्यांना 15 टक्के नोकऱ्या जाण्याची अपेक्षा आहे. अन्य 32 टक्के कंपन्यांना 15 ते 30 टक्के नोकऱ्या जातील असं वाटत आहे. बर्याच कंपन्यानी आपला महसूल 10 टक्क्यांपेक्षा जास्त आणि नफाही 15 टक्के घटेल असं म्हटल्याचं या सर्वेक्षणात सांगण्यात आलं आहे. याचा परिणाम वित्तीय वर्ष 2019 -2020 च्या चौथ्या तिमाहीवर आणि आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीवर होऊ शकेल.
याबाबत सीआयआयचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी म्हणाले की, अचानक लाॅकडाऊन लागू झाल्याने याचा फटका उद्योगांना बसणार आहेत. कंपन्यांना मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकार उद्योगांसाठी मोठ्या पॅकेजचीही घोषणा करू शकते. लाॅकडाऊनमुळे उद्योग क्षेत्रात उद्भवलेल्या समस्या उद्योगांनी सरकारपुढे मांडल्या आहेत. सरकारने यावर कार्यवाही करावी अशी अपेक्षा उद्योगांनी केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीताराजन यांनी याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असं म्हटलं आहे.
हेही वाचा -