रिझर्व्ह बँके (RBI)ने लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात करत गुरूवारी सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा दिला. त्यानुसार आरबीआयचा रेपो रेट ६.२५ टक्क्यांवरून ६.०० टक्क्यांवर आला आहे. दर कपातीमुळे गृहकर्ज, वाहनकर्ज आणि वैयक्तीक कर्ज आणखी स्वस्त होणार आहेत.
रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गर्व्हनर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या २०१९-२० या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या द्विमासिक पतधोरण आढावा बैठकीत (MPC) कर्जांचे व्याजदर पाव टक्क्यांनी (०.२५) कमी करण्यास आले. ६ सदस्यीय पतधोरण आढावा बैठकीत ५ सदस्यांनी व्याजदर कपातीला अनुकूलता दर्शवली. त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षात विकास दर ७ टक्क्यांपर्यंत राहील असा अंदाजही व्यक्त करण्यात आला.
याआधी शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली फेब्रुवारीत झालेल्या पहिल्याच बैठकीत तब्बल १८ महिन्यांनी व्याजदरांत पाव टक्का कपात करण्यात आली होती. त्यानंतर रेपो रेट ६.५० टक्क्यांवरून ६.२५ टक्के झाला होता. त्यात आणखी पाव टक्का कपात करण्यात आल्याने मागील २ महिन्यांमध्ये व्याजदरांत अर्धा टक्का कपात झाली आहे. परिणामी कर्जाच्या व्याजदरात कपात होऊन कर्जदारांच्या ईएमआयमध्येही घट होणार आहे.
आरबीआयच्या दृष्टीकाेनातूनचलनवाढीचा दर समाधानकारक स्तरावर आहे. येत्या ६ महिन्यां हा दर ४ टक्क्यांच्या आत राहील. या काळात अर्थव्यवस्थेच्या वाढीबरोबरच खासगी क्षेत्रातून गुंतवणूक वाढण्यासाठी त्यांना चालना देणं आवश्यक आहे.
देशभरातील बँका आरबीआयकडून घेत असलेल्या अल्पमुदतीच्या कर्जाला आरबीआय जो दर लावते त्याला रेपो रेट असं म्हणतात. तर याच बँकांनी आपल्याकडील जमा निधी आरबीआयकडे अल्पमुदतीसाठी जमा केल्यावर आरबीआ त्यांना जो व्याजदर देते त्याला रिव्हर्स रेपो रेट असं म्हणतात.
हेही वाचा-
रेपो रेटमध्ये कपात, गृहकर्ज स्वस्त होणार
१ हजार वैमानिकांचा संपाचा इशारा, जेटपुढील अडचणी वाढल्या