वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं मुंबईतील कोरोना वाढीचा दर १.९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळं ही बाब महापालिकेसाठी चिंतेची बनली आहे. बुधवारी १० हजार ४२८ मुंबईकरांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर २३ रुग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी १० हजार ४२८ जणांना बाधा झाल्यानंतर एकूण रुग्णसंख्या ४ लाख ८२ हजार ७६० वर पोहोचली आहे.
विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले १४ पुरुष आणि ९ महिलांचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. यापैकी १६ जणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमधील एकाचे वय ४० वर्षांखालील तर १७ जणांचे वय ६० वर्षांवरील होते, तर उर्वरित ५ जण ४० ते ६० वयोगटातील होते. आतापर्यंत ११ हजार ८५१ मुंबईकरांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे ६,००७ रुग्ण बुधवारी कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले.
आतापर्यंत ३ लाख ८८ हजार ०११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे, मात्र रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही कमी होऊन ८० टक्क्यांवर स्थिरावले आहे. विविध रुग्णालयांमध्ये ८१ हजार ८८६ रुग्ण उपचार घेत आहेत. मुंबईमधील रुग्णदुपटीचा कालावधी सरासरी ३५ दिवसांवर घसरला आहे, तर रुग्णवाढीच्या दराने १.९१ टक्क्यांवर उसळी घेतली आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी बुधवारी तब्बल ५१ हजार २६३ चाचण्या करण्यात आल्या.
कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या गटातील ३५ हजार ८४० संशयित रुग्णांचा शोध घेण्यात आला असून यापैकी १,०३७ संशयित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, तर उर्वरित संशयित रुग्णांना अटीसापेक्ष गृहविलगीकरणात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
हेही वाचा -