नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक झाल्याचं पहायला मिळत आहे. कोरोना रुग्णाची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी आता नवी मुंबई महापालिकेने आक्रमक पावले उचलली आहेत.
नागरिकांकडून कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याचं दिसून आलं आहे. ही बाब अत्यंत गंभीर्याने घेत पालिका क्षेत्रात विशेष दक्षता पथके पुन्हा कार्यरत करण्यात आली आहेत. नवी मुंबई महापालिकेने पोलिसांसह पालिकेची ३१ पथकं तयार केली आहे. या ३१ पथकांमधील १५५ जण नवी मुंबईकरांवर लक्ष ठेवणार आहेत.कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
प्रत्येक विभाग कार्यालय निहाय पोलिसांसह दक्षता पथके नियुक्त करण्यात आली आहेत. त्यांच्यांमार्फत दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसंच पोलीसांमार्फतही स्वतंत्ररित्या कारवाई केली जात आहे. मात्र, या कारवाया कमी असल्यानेपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रत्येक पथकात ५ व्यक्ती अशा १५५ जणांची ३१ विशेष दक्षता पथके तयार केली आहे.
ही विशेष पथके संपूर्ण महापालिका क्षेत्रातील कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर करडी नजर ठेवणार आहेत. प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रात सकाळी १ व रात्री १ अशी २ पथके कार्यान्वित असणार आहेत. याशिवाय कोरोना प्रसाराचा सर्वाधिक धोका असणाऱ्या एपीएमसी मार्केट क्षेत्रासाठी ५ व्यक्तींची ५ पथके तिन्ही शिफ्टमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर वॉच ठेवणार आहेत. अशाप्रकारे प्रत्येक शिफ्टमध्ये ५ याप्रमाणे १५ पथके एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणार आहेत.
विभाग कार्यालय क्षेत्रासाठी नियुक्त पथकांव्दारे लग्न व इतर समारंभ तसेच वर्दळीची ठिकाणे येथे कोरोना नियमांचे पालन होते की नाही यावर बारीक लक्ष राहणार आहे.
हेही वाचा-
१३४ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी मान्यता
महाराष्ट्रात कोविड लसीचे दररोज ३ लाख डोस द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश