मुंबईत तब्बल ४४३ अतिधोकादायक इमारती असल्याचं धक्कादायक वास्तव नुकतंच पुढं आलं आहे. या इमारतींच्या बाबतीत लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज असल्याचं मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलं. (443 extremely dilapidated buildings in mumbai says mayor kishori pednekar)
मुंबईतील अतिधाेकादायक इमारतींपैकी घाटकोपर, मुलुंड आणि वांद्रे पश्चिमधील सर्वाधिक १५६ इमारती अतिधोकादायक आहेत. मुंबई शहर व उपनगरातील सर्व खासगी व पालिकेच्या अखत्यारितील इमारतींचे पावसाळ्याच्या आधी सर्वेक्षण केलं जातं. त्यानंतर धोकादायक इमारतींची संख्या जाहीर केली जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धोकादायक इमारती कमी आहेत. दोन वर्षांपूर्वी मुंबईत ६१९ अतिधोकादायक इमारती होत्या. गेल्यावर्षी हा आकडा ४९९ होता. यापैकी ५० हून अधिक इमारती पाडल्या असून त्यांचा पुनर्विकास होणार आहे.
मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमवार २० जुलै रोजी मुंबई शहर व उपनगरातील धोकादायक इमारतीची सद्यस्थिती जाणून घेण्याकरीता भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पेंग्विन कक्षात म्हाडा इमारत दुरुस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, महापालिका, म्हाडा अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा - बोरिवलीत सर्वात जास्त प्रतिबंधित इमारती
मुंबई शहरातील धोकादायक इमारतीच्या प्रश्नाबाबत सन्मा श्री विनोद घोसाळकर जी , म्हाडा अधिकारी व महापालिका अधिकारी वर्गासह चर्चा करून आवश्यक सूचना व माहिती देण्यात आली त्याप्रसंगी@mybmc @AUThackeray @OfficeofUT pic.twitter.com/HTAua53ygW
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) July 20, 2020
यावेळी किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं की, मुंबईमध्ये सी १ श्रेणीतील ४४३ अतिधोकादायक इमारती आहेत. या इमारतींपैकी महापालिकेच्या ५६, शासनाच्या २७ तर ३६० या खासगी इमारती आहेत. या सर्व इमारतींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या इमारती कोणाच्याही मालकीच्या असोत, त्या रिकाम्या करण्यासाठी आता ठोस पावलं उचलली पाहिजेत, कुणीही जबाबदारी झटकून चालणार नाही. या सर्व अतिधोकादायक इमारतींना भेट देऊन या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांच्या समस्या समजावून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. नागरिकांचे अधिकार अबाधित ठेवून इमारती कशा पद्धतीने खाली करता येतील? याला प्राधान्य देणार असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
गेल्या आठवड्यात मुंबईतील फोर्ट भागात असलेल्या भानुशाली इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इमारतीच्या ढिगाऱ्याखालून २० पेक्षा जास्त लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर मालाडच्या मालवणी येथील एक दुमजली घर कोसळून २ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती.
हेही वाचा - घाटकोपर, मुलुंड, वांद्रेमध्ये धोकादायक इमारतींची संख्या सर्वाधिक