पावसाळ्यात मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यावर रेल्वे रुळांवर पाणी तुंबून वाहतूक विस्कळीत होते. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतं. त्यामुळं रेल्वे प्रशासनानं रेल्वे मार्गावर स्वयंचलित पर्जन्यमापक बसविण्यचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, पश्चिम रेल्वे मार्गावर स्वयंचलित पर्जन्यमापक बसविण्यात आले असून, आणखी ८ ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापक बसविले जाणार आहेत. त्याशिवाय, मध्य रेल्वे मार्गावर देखील स्वयंचलित पर्जन्यमापक बसविण्यास मध्य रेल्वेनं हवामान विभागाला हिरवा कंदील दर्शवला आहे. त्यामुळं कोसळणाऱ्या पावसाच्या प्रत्यक्ष वेळेची ताजी माहिती मिळून लोकल फेऱ्यांवर कमीत कमी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पहिल्या टप्प्यात ६ ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत.
पश्चिम रेल्वे आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग यांच्या प्रयत्नांनी पहिले स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र भाईंदर स्थानकावर उभारण्यात आलं आहे.
पहिल्या टप्प्यात भाईंदरसह महालक्ष्मी,
वांद्रे,
राम मंदिर,
दहिसर,
मीरा रोड या सहा ठिकाणी स्वयंचलित यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत.
दुसऱ्या टप्प्यात दादर आणि अंधेरी स्थानकात पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले.
तर आता विरार,
नालासोपारा,
वसई रोड,
बोरीवली,
गोरेगाव,
सांताक्रुझ,
वांद्रे टर्मिनस,
ग्रॅण्ट रोड या ठिकाणी यंत्रे बसविण्यात येणार आहेत.
तसंच,
मध्य रेल्वे मार्गावरील नाहूर,
विक्रोळी आणि हार्बर मार्गावरील मानखुर्द स्थानकावर लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.
त्यामुळं किती वेळेत किती पाऊस पडला याची नोंद घेऊन रेल्वे वाहतुकीचं नियोजन शक्य होणार आहे.
हे यंत्र मानवविरहीत असून सौरऊर्जेवर चालविण्यात येते. हे यंत्र बसविण्यासाठी ५ लाख ७५ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. पर्जन्यमापक यंत्रामुळं पाऊस किती पडला याच्या नोंदी ठेवणं शक्य होणार आहे. पावसात प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पाणी साचण्याच्या ठिकाणी अधिक पंपांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
हेही वाचा -
७ जूनला दहावीचा निकाल ही अफवा, बोर्डाने केला खुलासा