कुरार - नगरसेविका रुपाली रावराणे यांच्या धरणे आंदोलनानंतर मालाड (पू), शांताराम तलाव परिसरातल्या वस्तीत बुधवारी सौदर्यीकरणाचं काम सुरू करण्यात आलंय. या ठिकाणी लोकवस्तीलाच लागून भलेमोठे प्लॅस्टिक कचऱ्याचे गोदाम असून मुख्य रस्त्यावर कचरा परसला होता. त्यामुळं इथल्या रहिवाशांना साथीच्या आजारांनी घेराव घातला होता. याविषय नगरसेविका रुपाली रावराणे यांनी प्रभाग समितीच्या बैठकीमध्ये दोन वेळा पी उत्तर पालिकेच्या सहाय्यक आयुक्त संगीता हसनाले यांच्याकडे तक्रार केली होती. तरीही याकडं दुर्लक्ष करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी महापालिका उपायुक्त किरण आचरेकर यांच्याकडे तक्रार केली. आचरेकरांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिल्यानंतरही त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली. त्यामुळं सहाय्यक आयुक्त आणि संबंधित अधिकारी यांच्या निष्क्रीयतेचा निषेध करण्यासाठी नगरसेविका रावराणे यांनी पी उत्तर पालिका विभाग कार्यालयाच्या आवारात अजित रावराणे आणि कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन केलं. या आंदोलनात मुंबई महिला सरचिटणीस सानिका शिरगावकर, दिंडोशी तालुका अध्यक्ष प्रशांत घोलप, महिला तालुकाध्यक्षा जयश्री पेडणेकर, महिला वॉर्ड अध्यक्षा रश्मी मोरे, मीनाक्षी राखडे, कल्पना घोलप यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.