मुंबईत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी फेरीवाला आणि ना फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्यासाठी नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या होत्या, ज्याची तारीख संपली आहे. पण केवळ १७०० लोकांनी आपल्या हरकती आणि सूचना नोंदवल्या आहेत. सध्या या पत्रांच्या पडताळणीचं काम सुरू असून या हरकती आणि सूचना पुढील आठवड्यात जाहीर केल्या जातील.
फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेतर्फे फेरीवाला आणि ना फेरीवाला क्षेत्र बनवण्यात आलं. विशेष म्हणजे सरुवातील २२ हजार फेरीवाल्यांना बसवता येईल, अशाप्रकारे या फेरीवाला क्षेत्राची रचना करण्यात आली होती. पण आता त्यात वाढ करून ८५ हजार फेरीवाल्यांना व्यवसाय करता येईल, अशाप्रकारे फेरीवाला क्षेत्राची रचना केली जात आहे. त्यामुळे या फेरीवाला आणि ना फेरीवाला क्षेत्राबाबत जनतेकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. याची मुदत ३१ जानेवारी रोजी संपुष्ठात आल्यानंतर १५ दिवसांची मुदतवाढ दिली होती. त्यानुसार १५ फेबुवारीला ही मुदत संपली. परंतु या कालावधीत इमेल आणि निवेदनपत्राद्वारे सुमारे १७०० हरकती आणि सूचना प्राप्त झाल्याची माहिती उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी दिली आहे.
लोकांकडून प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांच्या पडताळणीचं काम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने सध्या सुरू आहे. आपल्या देखरेखीखाली हे काम सुरू असून किती हरकती आणि सूचना स्वीकारण्यात आल्या आहेत, याची माहिती पुढील आठवड्यानंतर जाहीर केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
या हरकती आणि सूचना नाकारल्या गेल्या असतील तर त्या कोणत्या कारणामुळे नाकारल्या, याची कारणं देऊन ती नाकारली जाईल. महापालिक आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत जनतेने केलेल्या हरकती आणि सूचनांचा विचार करतच फेरीवाला आणि ना फेरीवाला क्षेत्र बनवलं जाईल, असा विश्वास निधी चौधरी यांनी व्यक्त केला.