मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे १८९ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ११ जणांचा दिवसभरात मृत्यूही झाला आहे. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांचा आकडा ११८२ वर जाऊन पोहोचला आहे. तर आतापर्यंत ७५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार दगावलेल्या ११ जणांपैकी १० जणांना विविध आजारांनी ग्रासलेलं होतं.
दरम्यान, राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ९१ टक्के रुग्ण हे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणे इथले आहेत. एकट्या मुंबईत कोरोनाचे ६१ टक्के रुग्ण असून ठाणे, पालघर, नवी मुंबई भागात १० टक्के तर पुणे येथे २० टक्के रुग्ण आढळून आले आहेत. राज्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ५.५ टक्के असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
हेही वाचा - Coronavirus Updates: एकट्या मुंबईत कोरोनाचे ६१ टक्के रुग्ण
महाराष्ट्रात आतापर्यंत देशातील सर्वाधिक ३३ हजार कोविड-१९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १६५२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर एकट्या मुंबईत १९ हजार चाचण्या झाल्या आहेत. त्यातील १ हजार जण रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांपैकी ७० टक्के रुग्णांना लक्षणे नसून २५ टक्के रुग्णांना सौम्य स्वरूपाची तर ५ टक्के रुग्णांची स्थिती गंभीर आहे.
महाराष्ट्रातील चाचण्यांची संख्या वाढल्याने रुग्णांची संख्याही वाढत आहे. तसंच रुग्ण समोरुन येण्याची वाट न बघता महापालिका आता घरोघरी जाऊन चाचण्या करत आहे. केंद्र सरकारला सांगून आपण आणखी ५ चाचणी केंद्र येत्या २ ते ३ दिवसांत सुरू करत आहोत. यामुळे राज्यातील कोविड-१९ चाचणी केंद्रांची संख्या ३० वर जाईल, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.
दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा दीड हजारांच्या पलिकडे जाऊन पोहोचल्याने महाराष्ट्रात १४ एप्रिलनंतरही लाॅकडाऊन सुरूच ठेवण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. हे लाॅकडाऊन पुढचे १६ दिवस म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ काॅन्फरन्सिगच्या माध्यमातून झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. साेशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना ठाकरे यांनी ही माहिती दिली.
हेही वाचा - महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन सुरूच राहणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा