ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची प्रक्रिया सोसायटी स्तरावरच व्हावी, यासाठी पालिकेनं सुरू केलेला एएलएम उपक्रम अपयशी ठरल्याचं चित्र आहे. अनेक एएलएम त्यांची जबाबदारी पार पाडण्यात अयशस्वी ठरले आहेत. हीच बाब लक्षात घेऊन पालिकेनं आता कडक पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या वृत्तानुसार, ५६ एएलएमची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. तर १२६ एएलएमवर पालिकेची करडी नजर असणार आहे.
२ ऑक्टोबरपासून मुंबईतल्या मोठ्या सोसायट्यांमधून कचरा न उचलण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला होता. ओल्या-सुक्या कचऱ्याचे विभक्तीकरण होऊन कचऱ्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन व्हावं, या उद्देशानं ७१९ एएलएमची स्थापना करण्यात आली. त्यापैकी ५६ एएलएमनं आपली जबाबदारी पार पाडली नाही. त्यामुळे ५६ एएलएमची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे.
एएलएम म्हणजे अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट. मुंबईकर आणि महापालिका यातील अंतर कमी करण्यासाठी प्रत्येक वॉर्डात एएलएम गट स्थापन केले जातात. या गटांमध्ये महानगरपालिका, वॉर्डातील इमारती आणि चाळींमधील हाऊसिंग सोसायटी वा कमिटी सदस्य एकत्र येऊन नागरी समस्यांवर उपाययोजना करतात.
याच जबाबदाऱ्या निभावण्यात हे ५६ एएलएम कमी पडल्याचं पालिकेच्या नजरेस आलं. त्यानुसार या एएलएमवर कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा