मुंबईत भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यांच्यावर आवर घालण्यासाठी दररोज 104 कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजिकरण करण्यात येणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुढाकार घेत हे काम दोन प्राणीमित्र संघटनांना सोपवले आहे. युनिव्हर्सल अॅनिमल वेल्फेअर सोसायटी आणि इगल फाऊंडेशन अशी या दोन प्राणीमित्र संघटनांची नावे आहेत. एक कुत्रा पकडण्यासाठी महापालिका या संस्थांना 300 रुपये देणार आहे. या संस्थेतील प्राणीमित्रांना दिवसाला 104 कुत्रे पकडून कमीत कमी 15 कुत्र्यांचे निर्बिजिकरण करणे बंधनकारक रहाणार आहे. यासह प्रत्येक वस्तीत जाऊन या भटक्या कुत्र्यांना जेवण घालताना श्वानांच्या संख्येत वाढ होऊ नये याची काळजी देखील या प्राणीमित्रांना घ्यावी लागणार आहे.
हे देखील वाचा - मुंबईतील भटक्या कुत्र्यांमध्ये बसवणार मायक्रो चिप
मुंबईत 2015 मध्ये जवळपास 78 हजार जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू देखील झाला होता. मात्र या भटक्या कुत्र्यांचे निर्बिजिकरण झाल्याने 2016 मध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. अनेक ठिकाणी आजही भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
इतक्या कुत्र्यांचे झाले निर्बिजिकरण
वर्ष 2013 - 9, 722
वर्ष 2014 - 7, 236
वर्ष 2015 - 6, 414
वर्ष 2016 - 11, 967
हे देखील वाचा - भटक्या कुत्र्यांमुळे घाटकोपरकर हैराण
हे देखील वाचा - 'मुंबईत भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट'