दाटीवाटीच्या झोपडपट्टीमधील आणि उंच इमारतींमध्ये लागलेली आग विझवण्यासाठी मुंबई महापालिका (बीएमसी) आता वॉटर टॉवर वाहन खरेदी करणार आहे. वॉटर टॉवर वाहनामुळे उंच इमारतींवर उंचीवरून पाण्याचा मारा करता येणार आहे. हे वाहन खरेदीसाठी १३ कोटी रुपये खर्च येणार आहे. याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
आग विझवणाऱ्या या वॉटर टॉवर वाहनाची उंची ५५ मीटर असणार आहे. दाटीवाटीची झोपडपट्टी तसंच उंच इमारतीतील आग लागल्यास तेथे अवजड वाहने पोचू शकत नाही. त्यामुळे पालिकेने आग विझवणारा रोबोही आणला. मात्र, हा रोबोही काही ठिकाणी जिन्यावरून वर चढू न शकल्यामुळे नापास ठरला होता. त्यामुळे पालिकेने वॉटर टॉवर वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
पालिकेची मुंबईत एकूण ३४ अग्निशमन केंद्रे आहे. अग्निशमन दलाकडं २७० पेक्षा अधिक वाहनांचा ताफा आहे. अनेक ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने पोहोचू शकत नाही. मुख्य रत्यावर उभे राहून आगीवर पाण्याचा फवारा मारून आग विझवावी लागते. अशा ठिकाणी हे ५५ मीटर उंचीचे वॉटर टॉवर उपयोगी पडेल असं पालिका प्रशासनाने म्हटलं आहे.
हेही वाचा -
स्वाइन फ्लूचे राज्यात २४० बळी, मुंबईत ६ जणांचा मृत्यू
एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेवर प्रवासी नाराज