मुंबईतील अनेक तलावांचं पुनरुज्जीवन करण्यात येत असताना त्या पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाणही योग्यप्रकारे राखण्याचा प्रयत्न महापालिकेकडून होत आहे. त्यामुळे तलावांच्या पाण्याचं शुद्धीकरण प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर या तलावांमध्ये नौकाविहाराची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे. तलावांमध्ये माफक शुल्क आकारून नौका विहाराची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतच्या शक्यतेची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असं प्रशासनाने सांगितलं आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातील महापालिकेच्या ताब्यातील विविध तलावांचं सुशोभिकरण करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. मागील वर्षी वांद्रे तलाव, शीव तलाव, मुलुंडमधील मोरया तलाव आणि भांडुपमधील शिवाजी तलाव या ४ तलावातील पाण्याचं शुद्धीकरण यांत्रिकी आणि जैविक प्रक्रियेद्वारे करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर करण्यात येणाऱ्या या चार तलावांमधील हा प्रयोग यशस्वी ठरल्यास मुंबईतील सर्वच तलावांमधील पाण्याचं शुद्धीकरण करण्यात येणार असल्याचं महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
मुंबईतील तलावांमध्ये केरकचरा काढून त्यांचं सुशोभिकरण करण्यात यावं आणि माफक शुल्क आकारून त्याठिकाणी नौकाविहाराची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना नगरसेवक अनिल पाटणकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. तलावामध्ये प्रामुख्याने गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात मूर्तींचं विसर्जन करण्यात येतं. त्यामुळे शेैवाल आणि केरकचरा जमा होऊन एकप्रकारे दुर्गंधी पसरते, अशी चिंता व्यक्त करत अनिल पाटणकर यांनी ही मागणी केली होती.