येत्या १२ ऑगस्टला मुंबईसह राज्यभरात मुस्लिम बांधवांकडून बकरी ईद साजरी करण्यात येणार आहे. दरवर्षी बकरी ईदनिमित्त फ्लॅट, सोसायटी परिसरात बकऱ्यांची कत्तल केली जाते. मात्र यंदा बकरी ईदसाठी फ्लॅट आणि सोसायटी परिसरात कुर्बानी देण्यास उच्च न्यायालयानं मनाई केली आहे. बकरी ईदसाठी कत्तलखान्याबाहेर तसंच खासगी जागांसाठी देण्यात आलेल्या परवान्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावेळी उच्च न्यायालयानं बकरी ईदनिमित्त फ्लॅटमध्ये कुर्बानी देण्यास मनाई केली आहे. यामुळे मुंबई पालिकेकडे आलेले सुमारे ८ हजार परवाने रद्द होणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयानं मनाई करताना समुदायिक केंद्रात कुर्बानीची सोय असलेल्या ठिकाणी एक किलोमीटरच्या परिसरात कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीला स्वतंत्र परवानगी न देण्याचं आदेशात म्हटलं आहे. बकरी ईदसाठी पालिकेने ऑनलाइन जाहिरात दिली होती. या जाहिरातीमधून तात्पुपत्या काळासाठी बकरे कटाईचे परवाना देण्याचं सूचित करण्यात आलं होतं.
काही प्राणीमित्र संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली. तसंच, या निर्णयाला आव्हान दिलं होतं. त्यावेळी त्यांनी घरांमध्ये आणि सोसायटी परिसरात दिल्या जाणाऱ्या कुर्बानीला विरोध केला होता. या याचिकेमध्ये प्राणी संरक्षण कायद्यासह महापालिकेच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं सांगण्यात आलं होतं.
दरम्यान, बकरी ईदसाठी फ्लॅट आणि सोसायटी परिसरात कुर्बानी देण्यास उच्च न्यायालयानं मनाई केली आहे. त्यामुळं पालिकेनं घालून दिलेले नियम सर्वांना पाळणं बंधनकारक असणार आहे.
हेही वाचा -
नेहा-शिवानीच्या वादामागचं कारण काय?