मुंबईत मोठ्या प्रमाणावर साजरा होणारा गणेशोत्सव आता जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतशी कार्यकर्त्यांची लगबगही वाढली आहे. दुसरीकडे मुंबई महानगर पालिकेकडूनही गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी परवानगी देण्यास लवकरच सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयानं पालिकेला याआधीच नोटीस बजावली आहे.
यंदा मंडप परवानगीत कोणताही गोंधळ नको. कुठल्याही नियमाचा भंग नको. इतकंच काय तर गणेशोत्सवात आवाज कमी म्हणजे कमीच ठेवायचा, असा कडक आदेशच या नोटीसद्वारे दिल्याची माहिती उत्सवातील ध्वनीप्रदूषणाविरोधात उच्च न्यायालयातील याचिकाकर्त्या आणि आवाज फाऊंडेशनच्या कार्यकर्त्या सुमेरा अब्दुलाली यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे.
गणेशोत्सवासाठी रस्त्यावर मंडप घालण्यासाठी तसंच ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी काही नियम आहेत. पण या नियमांची योग्य ती अंमलबजावणीच होत नसल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. असं असताना नुकत्याच झालेल्या या याचिकेवरील सुनावणी दरम्यान प्रकर्षानं दिसून आली.
पालिकेच्या गणेशोत्सवासंदर्भतील तक्रारी नोंदवण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठीचा हेल्पलाइन क्रमांक सुरुच नसल्याची बाब याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. यावर न्यायालयानं प्रचंड नाराजी व्यक्त करत पालिकेला चांगलंच फैलावर घेतलं.
पालिकेचा हा ढिम्म कारभार लक्षात घेता न्यायालयानं यंदा गणेशोत्सवात कुठलाही हलगर्जीपणा नको, नियमाचा भंग नको असं थेट नोटीसद्वारेच बाजवलं आहे. महत्त्वाचं म्हणजे आवाज कमी असेल यावर लक्ष ठेवण्याचेही आदेश दिले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवात आता मंडळांना आवाज कमी कमीच ठेवावा लागणार हे नक्की. दरम्यान या याचिकेवरील पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार आहे.