Advertisement

कामगारांचं वेगाने लसीकरण करा, सरकारचं उद्योजकांना आवाहन

२५ टक्के लसी खासगी रुग्णालयांना देण्याचं धोरण असून उद्योगांनी त्यांच्याशी बोलणी करून त्यांच्या कामगारांना मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घ्यावं, अशी सूचना राज्य सरकारच्या वतीने उद्योजकांना करण्यात आली आहे.

कामगारांचं वेगाने लसीकरण करा, सरकारचं उद्योजकांना आवाहन
SHARES

२५ टक्के लसी खासगी रुग्णालयांना देण्याचं धोरण असून उद्योगांनी त्यांच्याशी बोलणी करून त्यांच्या कामगारांना मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घ्यावं, अशी सूचना राज्य सरकारच्या वतीने उद्योजकांना करण्यात आली आहे. 

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी ऑक्सिजन उत्पादन, साठा यांचं नियोजन तसंच उद्योगांतील कामगार – कर्मचारी यांचं लसीकरण, निर्बंध कडक करावे लागले तरी आर्थिकचक्र सुरू ठेवणे, उत्पादनावर परिणाम होऊ न देणे, कामगारांची कंपनीच्या परिसरातील तात्पुरती फिल्ड निवास व्यवस्था, कामाच्या वेळा, कोविड प्रादुर्भाव होऊ न देणारी व्यवस्था (बायो बबल) यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीआयआयच्या पदाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास आदींची उपस्थिती होती.

या ऑनलाईन बैठकीत सीआयआयचे पदाधिकारी उदय कोटक, निरंजन हिरानंदानी, हर्ष गोयंका, सलील पारेख, नील रहेजा, अनंत गोयंका, बाबा कल्याणी, बी त्यागराजन, जेन करकेडा, अनंत सिंघानिया, बनमाली अग्रवाल, निखिल मेसवाणी, अश्विन यार्दी, राशेष शहा, केशव मुरुगेश, भारत पुरी,  असीम चरनिया, सुनील माथुर, संजीव सिंग, नौशाद फोर्बस, डी के सेन, सुलज्जा फिरोदिया मोटवाणी, शरद महिंद्रा, आदी उद्योगपती सहभागी झाले होते.

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी देखील कोविडविषयक टास्क फोर्स स्थापन करावा त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत याचे संनियंत्रण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी दिले. कोविड काळातदेखील उद्योगांचं अर्थचक्र सुरू राहावं, उत्पादनांमध्ये अडथळे येऊ नये यादृष्टीने व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

हेही वाचा- तर निवडणुकीत सत्ताधारी पक्षांवर बहिष्कार टाकू; राज्यातले व्यापारी संतापले

२५ लाख डोसचा साठा

मुख्यमंत्री म्हणाले की, आज सुमारे १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन राज्यात केलं जातं. येणाऱ्या काळात कोविडचे आव्हान अधिक वाढलं तर ऑक्सिजनची मागणी दुसऱ्या लाटेपेक्षा देखील अधिक भासू शकते. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीबरोबरच ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवणे, त्यासाठी टँक्स, सिलिंडरची आवश्यकता आहे.

उद्योगांनी त्यांच्या कामगार व कर्मचाऱ्यांचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर करून घ्यावं. आजमितीस केंद्राने दिलेला २५ लाख डोसेसचा साठा खासगी रुग्णालयांकडे आहे. तो मोठ्या प्रमाणावर वापरला गेला पाहिजे.

आणखी काही महिने

छोट्या मोठ्या उद्योगांमध्ये कोविडपासून (covid19) प्रभावित न होणारी बायो बबल यंत्रणा निर्माण करून त्यामाध्यमातून आरोग्याचे नियम पाळून सुरक्षित उत्पादन सुरू ठेवता आलं पाहिजे. काटेकोर निर्बंध लावावे लागले, तर उत्पादनावर परिणाम होऊ नये म्हणून कामगारांच्या निवासासाठी कंपनीच्या परिसरात किंवा जवळपास फिल्ड निवास व्यवस्था उभारण्याच्यादृष्टीने नियोजन करावं, कामांच्या पाळ्या अशारीतीने निश्चित कराव्यात की, गर्दी होणार नाही व कुठल्याच सुविधेवर ताण येणार नाही.

डेल्टाच्या नव्या उत्परीवर्तीत विषाणूमुळे अधिक काळजी घ्यावी लागणार असून अनेक देशांनी परत निर्बंध लावण्यास व काळजी घेण्यास सुरुवात केली आहे., आणखी काही महिने तरी आपल्याला मास्क नियमित वापरणे, हात सातत्याने धुत राहणे, अंतर पाळणे व स्वच्छता ठेवणे याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावं लागणार आहे.

यावेळी बोलतांना डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितले की, गेल्या वर्षी पहिल्या लाटेत २० लाख रुग्ण आढळले, तर दुसऱ्या लाटेत दोन तीन महिन्यातच ४० लाख रुग्ण आढळले. पुढील लाटेचा वेग कितीतरी जास्त असू शकतो. सध्या पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात संसर्गाचं प्रमाण खूप जास्त आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा