अनेक विसरभोळे प्रवाशी कोट्यवधी रुपयांचं आपलं किमती सामान विमानतळावर विसरल्याचं समोर आलं आहे. ह्या सामानाची किंमत तब्बल १० कोटी ८ लाख रुपये आहे. यातलं काही सामान प्रवाशांना परत करण्यात आलं आहे. मात्र, बऱ्याच वस्तूंचे मालक अद्याप समोर आलेले नसल्याने हे सामान एअरपोर्ट आॅपरेटरकडे सोपविण्यात आलं आहे.
जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर १० कोटी ८ लाख १७ हजार ७८ रुपये किमतीच्या वस्तू प्रवाशी विसरले आहेत. यातील तर २ कोटी ९६ लाख १४ हजार ११० रुपये किमतीच्या वस्तू संबंधित प्रवाशांना परत देण्यात आल्याची माहिती सीआयएसएफतर्फे देण्यात आली. ७ कोटी १२ लाख २ हजार ९६८ रुपये किमतीच्या वस्तूंचे मालक मात्र समोर आलेले नाहीत. विमानतळावरील हरवले-सापडले या विभागात त्या वस्तू ठेवल्या आहेत.
प्रवाशांना लॅपटॉप, पर्स, मोबाइलचा सर्वाधिक विसर पडत असल्याचं दिसून आलं आहे. ९ महिन्यात ३५ हजार ८१३ वस्तू प्रवासी विसरले होते. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या साहाय्याने ५,४०५ प्रवाशांना त्यांच्या विसरलेल्या वस्तू केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) परत करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -
आगीच्या अफवेमुळे लोकलमधून तरुणीची उडी
राणीच्या बागेत बिबट्या, तरसाची जोडी होणार दाखल