मिरा-भाईंदर शहरात टाळेबंदी शिथिल केल्यानंतर रोज रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मागील १२ दिवसांत १५०० हून अधिक रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे मिरा - भाईंदर महापालिकेने शहरात लाॅकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जुलै ते १० जुलै या कालावधीत शहरामध्ये कडक लाॅकडाऊन असणार आहे.
मिरा-भाईंदर शहरात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३ हजारांवर गेली आहे, तर आतापर्यंत १४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रोज १०० नवे कोरोना रुग्ण या ठिकाणी सापडत आहेत. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पालिकेने पुन्हा लाॅकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात मिरा रोडमध्ये सर्वाधिक १४४७ कोरोनाचे रूग्ण आहेत. तर भाईंदर पूर्वमधील रुग्णांची संख्या ९०६ आहे. भाईंदर पश्चिमेमध्ये आतापर्यंत एकूूण ७८२ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत २२११ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ८१२ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.