Advertisement

वाढत्या कोरोनामुळं राज्यात पुन्हा कठोर निर्बंध

नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्यानं राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

वाढत्या कोरोनामुळं राज्यात पुन्हा कठोर निर्बंध
SHARES

मुंबईसह राज्यात (maharashtra) कोरोनाची (coronavirus) दुसरी लाट ओसरत असली तरी अद्याप धोका हा टळलेला नाही. शिवाय कोरोनाच्या उत्परिवर्तीत (डेल्टा प्लस) विषाणूचा धोकाही राज्यात वाढत आहे. यामुळं नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्यानं राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 

निर्बंध शिथिलीकरणाच्या पंचस्तरीय पद्धतीत बदल करण्यात येणार असून, दुकानांच्या वेळा पुन्हा कमी करण्यात येण्याचे संकेत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गेल्या २-अडीच महिन्यांपासून लागू असलेले कठोर निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय २० दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. त्यानुसार कोरोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण आणि प्राणवायूयुक्त खाटांची व्याप्ती या २ निकषांच्या आधारे राज्यातील जिल्ह्यांची ५ स्तरांत विभागणी करण्यात आली होती.

दर आठवड्याला परिस्थितीनुसार हे निर्बंध कमी-अधिक प्रमाणात लागू करण्याचे धोरण राबविण्यात आले होते. गेल्या ३ आठवड्यांपासून या धोरणानुसार महापालिका आणि जिल्हा स्तरानुसार निर्बंध लागू केले जात आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांत ६७ हजार ३३० उपचाराधीन रुग्ण असून सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, रायगड या पाच जिल्ह्यांत २६ हजार ६४० असे १० जिल्ह्यांत ९४ हजार उपचाराधीन रुग्ण आहेत. तर ४२ हजार रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. १० जिल्ह्यांतील साप्ताहिक बाधितांचे प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक आहेत. 

निर्बंध शिथिल केल्यापासून कोरोनाबाधितांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याबाबत मंत्रिडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजतं. सध्याच्या सूत्रावर आणि त्याच्या अंमलबजावणीवर मुख्यमंत्रीही नाराज असून तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे निर्बंध पूर्वीप्रमाणे कठोर करण्यावर बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार सध्याची पद्धती बदलून किंवा ती रद्द करून नवीन निर्बंधांबाबत २ दिवसांत आदेश काढण्यात येणार असल्याचं समजतं.

निर्बंध शिथिलीकरणानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच राज्यात कोरोनाच्या उत्परिवर्तित विषाणूचे (डेल्टा प्लस) २१ रुग्ण आढळून आले. या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोक्याचा इशारा केंद्र सरकारनं दिल्यामुळं राज्य सरकाची चिंता वाढली आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे समजतं.

सध्याच्या निर्बंध शिथिलीकरणाच्या पंचस्तरीय पद्धतीत बदल करण्यात येणार असून हे निकष अधिक कठोर करण्यात येणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी नियम अधिक कठोर करून अत्यावश्यक वगळता इतर दुकानांच्या वेळाही कमी करण्यात येण्याची शक्यता आहे. येत्या २ दिवसांत याबाबतची नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.



हेही वाचा -

Corona vaccine : २ वर्षांवरील मुलांचही होणार लसीकरण

  1. वन रुपी क्लिनिकचे संस्थापक राहुल घुलेंचा आत्महत्येचा प्रयत्न
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा