मुबईसह राज्यभरात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलं होतं. या लॉकडाऊनमुळं अनेक सुविधा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्ट उपक्रमाकडून वाहतूक सेवा पूरवली जात होती. परंतु, आता राज्यात अनलॉक सुरू झाल्यापासून बेस्ट उपक्रमानं बसच्या संख्येत वाढ केली आहे. मुंबईतील विविध मार्गावर बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. विषेश म्हणजे बेस्टनं महिला स्पेशल बस चालवत आहे. मात्र नियमित सेवेदरम्यान महिलांकरिता ५४ मार्गावर फेऱ्या देणारी बेस्ट सध्या केवळ दोनच विशेष महिला गाड्या चालवते आहे. महिलांकरिता या फेऱ्या अत्यंत अपुऱ्या असल्याने धक्काबुक्की सहन करत त्यांना कार्यालयीन वेळेत प्रवास करावा लागत आहे.
बेस्ट बस नियमितपणे सुरू झाली तरी मर्यादित फेऱ्या, मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्या, रेल्वे-मेट्रो बंद असल्यानं संपूर्ण ताण हा बेस्टवर येत आहे. त्यामुळं दररोज गर्दी, धक्काबुक्कीला तोंड देत प्रवाशांना कार्यालय गाठावं लागत आहे. त्यात सामाजिक अंतराचे तीनतेरा वाजलेले दिसतात. कोरोनाची लागण झालेले बेस्ट चालक-वाहक, अन्य कर्मचारी व कोरोनाच्या केवळ धास्तीने गैरहजेरी लावणारे कर्मचारी यांमुळे बेस्टला आपला संपूर्ण ३,५०० गाड्यांचा ताफा रस्त्यावर उतरवताना अडचणी येत आहेत.
६०० बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे ताफ्यात ३,५०० असूनही फक्त २,५०० बस चालवाव्या लावत आहेत. अपुऱ्या गाड्यांमुळं प्रवाशांची मोठी गैरसोय होते आहे. यामध्ये महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. बेस्ट बसमधील प्रवासात महिला प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे. बस मिळालीच तर त्यात प्रवेश करणं मोठी कसरत असते. गर्दीत पुरुष प्रवाशांची धक्काबुक्की सहन करत प्रवेश करावा लागतो. प्रवेश मिळाला तरी बसण्यासाठी जागा मिळेलच असं नाही.
बेस्टचे सध्याचे प्रवासी
दिवस | बसगाड्या | प्रवासी | उत्पन्न (रुपयांत) |
८ जून | २,१३२ | ४,१९,१५३ | ४०,४४,७ |
९ जून | २,३०८ | ४,७३,६८० | ४५,५३,०२८ |
१० जून | २,४०० | ५,२६,३८८ | ४८,६३,७६७ |
हेही वाचा -