भारताच्या गुणवत्ता परिषदेने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात देशभरातील 407 रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेचा आढावा घेण्यात आला आहे. या सर्वेक्षणात मुंबईतील सर्वात वर्दळीचे स्थानक अशी ओळख असलेल्या दादर स्थानकाला 330 वे स्थान मिळाले आहे. गेल्या वर्षी याच यादीत दादरला 102 वे स्थान मिळाले होते. अवघ्या वर्षभरात दादर स्थानकावरील अस्वच्छेत वाढ झाल्याने या यादीत दादर स्थानक अक्षरश: तळाला गेले आहे.
नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात टॉप 10 स्थानकांमध्ये मुंबईतील एकाही स्थानकाला स्थान मिळवता आलेले नाही. यावरून मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेत चालढकल होतेय का? असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे.
रेल्वे अधिकारी प्रत्येक स्थानक स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. परंतु या प्रयत्नांना प्रवाशांची पूरक साथ मिळते का? प्रवासी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावतात का? यावरही प्रश्नचिन्ह कायम आहे. स्थानकांची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी प्रवाशांचीही असून बहुतांश प्रवासी मात्र त्याकडे डोळेझाक करत असल्याचे, यावरून स्पष्ट होत आहे.