Advertisement

आॅक्सिजनवरील कोविड रुग्णसंख्या ३० हजारांवर गेल्यास पुन्हा कडक निर्बंध!

राज्यातील कोविड रुग्णांसाठी दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन (सुमारे ३० हजार रुग्णांसाठी) लागू लागला की राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावला जाईल, असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे.

आॅक्सिजनवरील कोविड रुग्णसंख्या ३० हजारांवर गेल्यास पुन्हा कडक निर्बंध!
SHARES

राज्यातील कोविड रुग्णांसाठी दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन (सुमारे ३० हजार रुग्णांसाठी) लागू लागला की राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावला जाईल, असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. 

कोविड रुग्णांची संख्या घटली असली तरी मागील अनुभव लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी अतिशय काळजी घेऊन वागायचं आहे. स्वतः आरोग्याचे नियम पाळताना आपल्यामुळे इतरांनाही आरोग्याचा कुठला धोका निर्माण होणार नाही हे पाहायचे आहे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

आपण निर्बंध शिथिल केले असले आणि तिसरी लाट येणार की येणार नाही याचा अंदाज करीत असलो तरी या विषाणूच्या बदलत्या अवतारापासून आपण सावध राहिलंच पाहिजे. दुसऱ्या लाटेच्या वेळी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे केवळ आपल्याच नव्हे, तर देशासमोर कसं आव्हान उभं ठाकलं होतं ते उदाहरण अजून ताजं आहे. म्हणूनच यावेळी राज्यातील निर्बंध किंवा लॉकडाऊन लावताना ऑक्सिजनची लागणारी गरज हा निकष ठेवण्यात आला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. 

हेही वाचा- १५ ऑगस्टपासून मॉल, हॉटेलसोबतच 'या' गोष्टींवरील निर्बंध होणार शिथिल, पण...

यापुढे राज्यातील  कोविड रुग्णांसाठी दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागू लागला की राज्यात लॉकडाऊन लावला जाईल. आपणास माहीत आहे की, राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता मर्यादित असून दररोज केवळ १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन केलं जातं. दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली तसंच ऑक्सिजनची गरजही खूप वाढली होती, त्यामुळे सुमारे ५०० मेट्रिक टन ऑक्सिजन अतिशय प्रयत्नपूर्वक इतर राज्यांतून आणावा लागला होता. दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची कोविड रुग्णांसाठी आवश्यकता भासू लागली की (सुमारे ३० हजार रुग्णांसाठी) राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.

गेल्या पावणे दोन वर्षांत कोविडने खूप काही शिकवलं आहे. ही लढाई आपण एकत्र मिळून लढतो  आहोत, आणि मला खात्री आहे शासनाने दिलेल्या सूचना या सर्वांच्या भल्यासाठीच आहेत हे लक्षात घेऊन आपण सहकार्य कराल, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

मी परत सांगतो, निर्बंध लावण्यात आम्हाला आनंद नाही. कोविडचा डेल्टा अवतार आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये अमेरिका, ब्रिटनमध्ये सुद्धा परत मोठ्या प्रमाणावर पसरतो आहे.  अशा परिस्थितीत आपल्यालाही सगळ्या बाबतीत अतिशय काळजीपूर्वक व्यवहार खुले करावे लागत आहेत. परवा आपण मर्यादित प्रमाणात का होईना, पण लोकल प्रवासास मान्यता दिली. आज देखील आपण हॉटेल उपहारगृह, दुकाने यांच्या बाबतीत निर्णय घेतले आहेत. इतरही काही क्षेत्रांमधून निर्बंध शिथिल करण्याची मागणी होती आहे, आपण यावर देखील संपूर्ण काळजी घेऊन निर्णय घेऊ, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

हेही वाचा- आॅगस्ट १ ते १० तारखेदरम्यान राज्यात लसीचा ३० टक्के तुटवडा!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा