Advertisement

स्थायी समिती विरुद्ध पालिका प्रशासन वाद पेटणार

स्थायी समितीच्या निर्णयाला डावलून परीक्षा घेण्यात आल्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

स्थायी समिती विरुद्ध पालिका प्रशासन वाद पेटणार
SHARES

मुंबई महापालिकेत (बीएमसी) ३४१ कनिष्ठ अभियंत्यांची  पदे सरळसेवा भरतीतून भरण्यात येणार होती.  कनिष्ठ अभियंत्यांची ही भरती प्रक्रिया स्थायी समितीने रद्द ठरवली होती. मात्र, यासाठीची परिक्षा पूर्वनियोजित वेळेनुसार सोमवारी घेण्यात आली. पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या निर्णयाला डावलून परीक्षा घेतल्याने आता स्थायी समिती आणि पालिका प्रशासन असा वाद पेटणार आहे.

स्थायी समितीच्या निर्णयाला डावलून परीक्षा घेण्यात आल्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात स्थायी समितीची पूर्वमंजुरी न घेता पालिका प्रशासनाने कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया राबवली. आचारसंहितेत भरती प्रक्रिया राबवल्याने अनेक उमेदवारांना यात भाग घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेची मुदत १५ दिवसांनी वाढविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली होती. मात्र पदे तातडीने भरणे आवश्यक असल्याने पूर्वनियोजित दिवशी आॅनलाइन परीक्षा घेण्यात येईल, असं पालिकेच्या नगर अभियंता विभागाने सांगितलं होतं.  यामुळे स्थायी समिती सदस्य संतप्त झाले. त्यांनी भरती प्रकिया रद्द करण्याची मागणी केली.

मात्र, अभियंत्यांची परीक्षा पूर्वनियोजित वेळेनुसार आयआयटी पवई येथे सोमवारी घेण्यात आली. स्थायी समितीने भरती प्रक्रिया रद्द केल्यानंतरही प्रशासनाने परीक्षा घेतल्यामुळे विरोधी पक्षामध्ये नाराजी आहे. या परीक्षेची कोणतीही माहिती नगरसेवकांना देण्यात आलेली नाही. हे स्थायी समितीच्या अधिकारावरच गदा असून प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले.



हेही वाचा -

'आरे वाचवा' मोहिमेला पाच वर्षे पूर्ण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा