मुंबईसह संपूर्ण देशाला 'कोरोना व्हायरस'नं घाबरून ठेवलं आहे. देशातील अनेक भागात कोरोना व्हायरसचे संशयित आढळत असल्यानं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळं दररोज मुंबई विमानतळावरील प्रवाशांची तपासणी केली जात आहे. कोरोना व्हायरसचा चीनमध्ये उद्रेक झाल्यानंतर अन्य देशातील रुग्णांची संख्या आता वाढती आहे. यामुळे चीनसह दक्षिण कोरिया, जपान, इटली, इराण, हाँगकाँग, तैवान, सिंगापूर, मलेशिया, व्हीएतनाम, इंडोनेशिया व नेपाळ या देशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची विस्तृत वैद्यकीय तपासणी करण्याची सूचना केंद्र सरकारकडून सर्व विमानतळांना देण्यात आली आहे.
या देशांमधून आलेले प्रवासी हे भारतीय असो वा परदेशी, अशा प्रत्येकाची तपासणी करण्यात यावी. ताप, सर्दी, खोकला यासारखी लक्षणं नसली तरी या संबंधित देशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचा पूर्ण पत्ता व मोबाइल क्रमांक गोळा करावा. जो भारतीय प्रवासी या दोन्हींची माहिती देण्यास तयार होणार नाही, त्यांना वेगळं करून विलगीकरण शिबिरात ठेवलं जाईल. तसंच, परदेशी प्रवासी अशाप्रकारे माहिती देत नसल्यास त्यांना देशात प्रवेश दिला जाणार नाही. विमानतळावरूनच परत पाठवले जाईल. परदेशी प्रवाशांनी शहरात दाखल झाल्यानंतर कुठे राहणार? याची विस्तृत माहिती प्रशासनाला देणे अनिवार्य असेल, अशा कडक सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या गुप्तचर विभागानं विमानतळांना दिली आहे.
या सूचनेनंतर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडनं तपासणीसाठी अधिक कठोर पावलं उचलली आहेत. संबंधित देशांपैकी सिंगापूर येथून मुंबईत दररोज सर्वाधिक ६ विमाने येतात. त्याखालोखाल मलेशियाची राजधानी क्वाललंपूर येथून ४ विमानं येतात. तर अन्य देशांमधून प्रत्येकी १ किंवा २ विमानसेवा दररोज मुंबईसाठी आहेत. याप्रकारे साधारण १६ विमानांमधून दररोज ४ हजार प्रवासी संबंधित देशांमधून रोज मुंबईत दाखल होतात. त्यांची तपासणी सुरु झाली आहे.
कोरोना व्हायरच्या उद्रेकानंतर एअर इंडियासह अन्य कंपन्यांनी चीनच्या सर्व विमानसेवा बंद करण्यात आल्या आहेत. पण इथिओपिअन एअरलाइन्सनं मात्र त्याची गाँगझाऊ-मुंबई-आदिस आदाबा ही सेवा कायम ठेवली आहे. या सेवेचं रोज एक विमान गाँगझाऊहून सध्या मुंबईत येत आहे.
हेही वाचा -
दादरच्या फूल मार्केटमध्ये प्लास्टिक विरोधात कारवाई
मेट्रो स्थानकाबाहेरील सायकल सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद