शेतकऱ्यांचा सातबारा तपासून त्यांना ठराविक दिवशी आणि ठराविक वेळतच निश्चियत केलेल्या जागेवर शेतमाल विक्रीची परवानगी देण्याची सूचना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली आहे. यासाठी सर्व विभाग कार्यालयांनी वाहतुकीस अडथळा नसेल अशा जागा तातडीने निश्चित करण्याच्या सूचना महापौरांनी यावेळी महापालिकेचे उपायुक्त आणि सर्व सहायक आयुक्तांना केल्या आहेत.
मुंबईतील विविध प्रभागात शेतकऱ्यांना शेतमाल विकण्याककरता शेतकरी आठवडी बाजारासाठी परवानगी मिळण्याबाबत महापौर विश्वकनाथ महाडेश्वीर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महापालिका उप आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांची संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश देत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल मुंबईत विकता यावा, याकरता चोवीसही प्रभागातील जागा आठवडी बाजारपेठेसाठी तातडीने निश्चित करावेत, अशी सूचना महापौरांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी आपला माल मंत्रालयासमोर फेकून दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या समवेत आयोजित बैठकीत शेतकऱ्यांना मुंबईत आठवडी बाजारासाठी जागा देण्याचं निश्चित करण्यात आलें. त्यानुसारच मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी नगरसेवक अनंत नर, उपायुक्त आनंद वागराळकर, रणजित ढाकणे, जी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन, एच/पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाणे, सहाय्यक आयुक्त (बाजार) डॉ. संगीता हसनाळे, जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार, विविध प्रभागाचे सहाय्यक आयुक्त आणि त्यांचे प्रतिनिधी शेतकरी आठवडी बाजार संयोजक संजय नटे तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परांडा येथील शेतकरी प्रतिनिधी उमेश नाईककिंदे, शंकर टिपे, श्रीकांत मोहिते आदी उपस्थित होते.