मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी गुरुवारी तातडीची बैठक घेतली. या बैठकीला पालिकेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसंच मुंबईकरांसाठी मार्गदर्शक नियम देखील लागू करण्यात आले आहेत. या नियमांचं उल्लंघन केल्यास कडक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.
मुंबईत पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्याबाबत आयुक्तांनी काही ठळक सूचना केल्या. मुंबईत आता कोरोनाबाधित होम क्वॉरन्टीन व्यक्ती फिरताना आढळल्यास त्याच्यावर थेट एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. विवाह कार्यालये, सभागृह आदी ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात वा सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र येण्यावर मर्यादा आणली गेली आहे.
महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कोरोना विषाणू विषयीची नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) February 18, 2021
'मिशन झिरो' साध्य करण्याकरिता या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.#NaToCorona#MissionZero pic.twitter.com/9Od18EyfGG
सार्वजनिक कार्यक्रमात एकावेळी ५० पेक्षा जास्त जणांना एकत्र येता येणार नाही, असे आयुक्तांनी नमूद केले आहे. मास्क वापरण्यासह इतर नियमांचे पालन होत नसल्यास कठोर कारवाई करण्यात यावी. कुणी नियमभंग करत असेल तर वेळप्रसंगी गुन्हे नोंदवा, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
याशिवाय लग्न कार्यालये, रेस्टॉरंट्स, नाईट क्लबवर धाडसत्र सुरु होणार आहे.दर दिवसाला प्रत्येक वॉर्डमध्ये किमान चार लग्न कार्यालये, चार रेस्टॉरंटस् आणि किमान एक नाईट क्लबवर धाड टाकून कारवाई केली जाणार आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर या लोकलच्या तीनही मार्गांवर एकूण तीनशे मार्शल तैनात करण्यात येणार आहेत.
कोरोना: मुंबईतील गर्दीच्या ठिकाणांवर महापालिकेची नजर
राज्यात आठवड्यानंतर कडक निर्बंधांचे संकेत