मुंबईसह राज्यभरातील सर्व गणेश भक्तांनी १० दिवस मुक्कामासाठी आलेल्या बाप्पाला ढोल-ताशांच्या गजरात नाचत गाजत निरोप दिला. टाळ-मृदुंगाच्या गजरात, लेझिमच्या तालात, गुलाल उधळत राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या', असा जयघोष करत गणरायचं विसर्जन करण्यात आलं. एकीकडे आनंदमय वातावरण तर दुसरीकडे काही गणेश भक्त जखमी झाल्याच्या घटना घडल्या. मुंबईतील गिरगाव चौपाटी परिसरात बाप्पाला निरोप देताना वेगवेगळ्या घटनेत तब्बल ४१ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
बाप्पाला निरोप देताना जखणी झालेले हे ४१ जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचार करून सोडण्यात आलं. परंतु, एक जण या घटनेत फ्रॅक्चर झाल्याचं समजतं. दरम्यान, गणेश विसर्जनावेळी कोणताही अडथळा येऊ नये यासाठी ५३ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. मुंबईत तब्बल ५० हजार पोलीस तैनात करण्यात आले होते. या विसर्जन मिरवणुकांवर ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच ठेवण्यात आला होता.
गुरूवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईत ९ हजार बाप्पांना निरोप देण्यात आला. त्यामध्ये ३८३ सार्वजनिक, ८९१८ घरगुती गणपतींसह ६४ गौरींचा समावेश होता. संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास लालबागचा राजा चिंचपोकळी पुलावरून मार्गस्थ झाला. त्यावेळी लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी झाले होते.
हेही वाचा -
समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी कर्ज मंजुरीची उद्दिष्ट्यपूर्ती, मुख्यमंत्र्यांची घोषणा
सुप्रिया सुळे टॅक्सी चालकावर संतापल्या अन् म्हणाल्या...